नगर कॉंग्रेसचे माजी शहराध्यक्ष बाळासाहेब भुजबळ यांनी भाजप नेते आमदार आशिष शेलार यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. स्वगृही परतल्याची भावना व्यक्त करीत त्यांनी सविस्तर भूमिका मांडली आहे.
भुजबळ यांनी म्हटलं आहे की, काँग्रेस पक्षात काम करणार्या व्यक्तींची दखल घेण्यात येते हा इंदिराजींच्या काळापासूनचा इतिहास आहे. प्रामाणिकपणे काम करुन पक्ष संघटना वाढीस लावण्यासाठी काम करावे लागते व नेमके तेच काम मी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न पक्षात केला. प्रारंभी च्या काळात पक्षात काम करण्यास मला प्रोत्साहन मिळाले. एवढेच नाही तर शहराध्यक्ष पदावर बहुमताने लागोपाठ दोन वेळा संधी मिळाली. या काळात पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष भानुदास कोतकर होते. त्यांनी प्रोत्साहनच दिले. शहरात पक्ष संघटना मजबूत करुन जुन्या-नव्याची एक मजबुत फळी निर्माण केली. पक्ष संघटनेची जबाबदारी मी समर्थपणे सांभाळण्याचा प्रयत्न करतांना सत्तेचे लाभाचे पद म्हणजे, नगरसेवक पदापासून दूर रहावा लागले. याची खंत कधी बाळगली नाही. पक्षाने कोतकर यांच्यावर निलंबनाची कारवाई केल्यानंतर शहरातली पक्ष संघटना जिवंत ठेवण्याचे मोठे आव्हान माझ्यासमोर होते; तेही पेलण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न केला. परंतु पक्षासाठी प्रामाणिक काम करणार्या निष्ठावान कार्यकर्त्यांना अंतर्गत गटबाजीचा फटका बसतो. तसा फटका मलाही जाणवला. एकवेळ पक्षासाठी काम निष्ठेने केले नाही तरी चालू शकते पण, स्थानिक नेत्यांची मनधरणी करणे, त्यांच्यापुढे लाचार होणे असा प्रकार जर आपण स्वीकारला नाही तर सपत्नीपणाची वागणूक मिळते हा अनुभव पक्षात गेल्या 3-4 वर्षात मी व शहर काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी अनुभवला. पक्षाच्या निष्ठावंतांना डावलून निष्ठावंतांवर खोटे आरोप करुन पक्षातून बाहेर जावे अशा हेतूने कारस्थान झाले, त्याचा मी बळी गेलो. वास्तविक सन 2010 नंतर पक्षाचे शहरात काम करतांना पक्ष जिवंत ठेवतांना माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांला काय यातना झाल्या याचा विचार करुन स्थानिक पक्षाने नेतृत्वाकडून सकारात्मक शब्दात भावना व्यक्त करता आल्या नाहीत. पक्षाने ज्यांना उमेदवारी दिली, त्यांचे प्रामाणि काम करुन ही या नेत्यांना त्याची जाणिव राहिली नाही. पक्षात स्वार्थ व प्रसिद्धी हेतूने जर मी काम केले असते तर शहर काँग्रेसचे पदाधिकारी, सदस्य माझ्या सोबत आजपर्यंत राहिलेच नसते ? माझ्यावर कारवाई करुन मोठा अन्याय केला. तरीही शहरातला एकही कार्यकर्ता, पदाधिकार्यांनी माझी साथ सोडली नाही. खरं तर आज मी भाजपमध्ये प्रवेश करतो हे मला साथ देणार्या सहकार्यांच्या शब्दाखातर. कारण या सहकार्यांनी मला प्रति प्रश्न केला. आजपर्यंत आम्ही तुमचे ऐकले आता तुम्ही आमचे ऐका मला त्यांचे ऐकावे लागले. मी काँग्रेस सोडून कोणत्याही पक्षात जाण्याचा निर्णय धेतला असता तरी त्या-त्या पक्षातील नेते, कार्यकर्त्यांनी सहकारी या भावनेने मला जवळ केले असते. त्यामुळे पक्षबदल करणे ही तसे अवघड होते. पण, माझ्या सहकार्यांच्या शब्दाला मान देऊन मी भाजपत प्रवेश करत आहे. काँग्रेस पक्षा निष्ठेने काम करुनही ज्यांना मार्गदर्शक सहकारी म्हणून स्वीकारले त्यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी मला सापत्नीपणाची वागणूक देत अपमान करत मला पक्षा सोडण्यास भाग पाडले. भाजप या पक्षात मी पूर्वी कार्यरत होतो. भाजप सोडून कॉग्रेसमध्ये आलो तरी भाजप पक्षाती (शहरातील) अनेकांशी माझ्या स्नेहाचा संबंध कायम राहिला. जिथे जीवाभावाचे सहकारी आहे आणि माझ्या बरोबर असलेले जीवाभावाचे सहकारी म्हणतात. या सर्वांच्या म्हणण्यानुसार मी यापुढेही कार्यरत असणार आहे. पद मिळो, सत्ता मिळो अथवा न मिळो पण, संघटन महत्वाचे आहे. या माध्यमातून शहराचा विकास, सामान्यांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्नाचा पुनश्च श्री गणेशा आजपासून करत आहे.






