नगर – अहमदनगर शहर व संपूर्ण नगर ग्रामीण तालुक्यासाठी सद्यस्थितीला एकच तहसीलदार कार्यालय कार्यरत असून अहमदनगर शहर व नगर तालुक्याची वाढती लोकसंख्या लक्षात घेता तसेच कामाचा व्याप लक्षात घेऊन एका तहसील कार्यालयावर कामाचा ताण पडत असून त्यासाठी अहमदनगर शहरासाठी स्वतंत्र तहसील कार्यालय निर्माण करने गरजेचे आहे यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे आ. संग्राम जगताप यांनी मागणी नगर शहरासाठी स्वतंत्र तहसील कार्यालय निर्माण करावे अशी मागणी यावेळी केली.
एकत्रित तहसील कार्यालयामुळे नगर ग्रामीण व शहरातील अनेक लोकांची कामे वेळेवर होत नसून त्यामुळे सदर तहसील कार्यालयात नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. सदर कार्यालयात नागरिकांचे सातबारा, नोंदी, पीकपाहणी, विविध प्रकारचे दाखले, स्वस्त धान्य नागरिकांना वेळेवर मिळत नाही तसेच इतर पुरवठा विषयक कामे संजय गांधी योजनेअंतर्गत लोकांना दिली जाणारी पेन्शनविषयक सेवा यामध्ये फार दिवस नागरिकांची कामे रखडली जातात. मा. तहसिलदार यांच्याकडे अनेक दिवसांपासून महसूली दावे व हरकती प्रलंबित आहेत. नागरिकांची होणारी गैरसोय व वेळेचा अपव्यय लक्षात घेता अहमदनगर शहर व नगर तालुका यांसाठी स्वतंत्र कार्यक्षेत्राचे तहसील कार्यालय निर्माण करणे अत्यंत आवश्यक आहे अशी मागणी यावेळी केली.
आमदार संग्राम जगताप यांनी महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे कडे स्वतंत्र तहसील कार्यालय निर्माण करण्याची मागणी केल्यानंतर त्यांनी तातडीने जिल्हाधिकारी यांना नगर शहरासाठी स्वतंत्र तहसील कार्यालयाचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना यावेळी दिल्या