बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान, म्हणाले…

0
18

बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली. या घटनेनंतर संपूर्ण राज्यात मोठी खळबळ उडाली. या प्रकरणाचे पडसाद हिवाळी अधिवेशनात देखील उमटले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवेदन देत या संपूर्ण घटनेची माहिती दिली. तसेच या घटनेची एसआयटी आणि न्यायालयीन चौकशी करण्यात येणार असल्याची घोषणा केली. दरम्यान, संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावर राजकीय वर्तुळातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी देखील या घटनेबाबत विधानसभेत आवाज उठवला.

बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या संदर्भात बोलताना आमदार सुरेश धस यांनी देवेंद्र फडणवीस यांनी बीड जिल्ह्याचं पालकमंत्री पद स्वीकारावं, अशी मागणी केली. तसेच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली. तसेच या प्रकरणातील काही आरोपी अद्याप फरार आहेत त्यांनाही तातडीने अटक करण्याची मागणी आमदार सुरेश धस यांनी केली. तसेच खासदार सुप्रिया सुळे यांनीही या घटनेवरून सरकारवर टीका केली. या संपूर्ण प्रकरणावर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं. तसेच यावेळी बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाबाबतही त्यांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी सूचक प्रतिक्रिया दिली.

बीड जिल्ह्याचं पालकमंत्री पद तुम्ही (देवेंद्र फडणवीस यांनी) घ्यावं अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी केली आहे. यावर प्रतिक्रिया काय? असं देवेंद्र फडणवीस यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारलं असता ते म्हणाले की, “बीड जिल्ह्याचं पालकमंत्री पद कोणी घ्यायचं? यासंदर्भात मी (देवेंद्र फडणवीस), उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आम्ही मिळून ठरवू. मग बीड जिल्ह्याचं पालकमंत्री पद कोणी घ्यायचं? कोणाकडे द्यायचं? याची चर्चा करू. मात्र, बीड जिल्ह्यात कोणाचीही दादागिरी आम्ही चालू देणार नाही”, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.