Jagan Mohan Reddy..
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी गुरूवारी सर्वांनाच धक्का दिला. मंत्रिमंडळ बैठकीनंतर त्यांनी मंत्रिमंडळातील सर्वच मंत्र्याचा राजीनामा घेतला. काही प्रमुख नेत्यांना वगळता ते 24 पैकी सुमारे 19 मंत्र्याचा राजीनामा घेतील, असा अंदाज व्यक्त केला जात होता. पण त्यांनी सर्वांचाच राजीनामा घेतल्याने चर्चांना उधाण आलं आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर जगनमोहन यांनी दिलेला शब्द करून दाखवला आहे. मंत्रिमंडळात नेत्यांचा समावेश करताना त्यांनी हे मंत्रिमंडळ दोन ते अडीच वर्षांचेच असेल, असं स्पष्ट केलं होतं. त्यानंतर इतर आमदारांना संधी दिली जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. त्यानुसार गुरूवारी त्यांनी सध्याच्या मंत्रिमंडळाची शेवटची बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी सर्वच मंत्र्याचे राजीनामे घेतले. त्यानुसार त्यांनी आपला शब्द खरा करून दाखवत इतर आमदारांची मनं जिंकली आहेत. त्यामुळे इतर मतदारसंघांनाही न्याय मिळणार असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.