जळगाव – जालन्यात मराठा मोर्चावर लाठीमार करण्याचे आदेश आमच्याकडून देण्यात आल्याचे सिद्ध झाले तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मी, तिघेही राजकारणातून संन्यास घेऊ. मात्र, हे आरोप सिद्ध करता आले नाहीत तर विरोधकांनी राजकारणातून संन्यास घ्यावा, अशी आव्हानाची भाषा करणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शरद पवार यांनी समाचार घेतला. शरद पवार यांनी अजितदादांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना म्हटले की, आम्हाला एवढं माहिती आहे की, तिथे लाठीहल्ला झाला. या घटनेचे जे काही व्हिडिओ दाखवले जात आहेत, त्यामध्ये पोलीस दलाचे लोक लाठीहल्ला करताना दिसत आहेत. त्याच्या खोलात जाणं सरकारचे काम आहे. आता तो लाठीहल्ला करण्याच्या सूचना कोणी दिल्या, का दिल्या, त्याची गरज होती का, या सगळ्याचे स्पष्टीकरण सरकारनेच द्यावे. कारण यंत्रणा तुमच्या हातात आहेत, आमच्या हातात नाहीत, असे शरद पवार यांनी म्हटले.