खारघरमधील कार्यक्रमात उष्माघाताने १४ जणांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचे शवविच्छेदन अहवाल समोर आले आहेत
मृत्यूमुखी पडलेल्या १४ पैकी १२ जणांच्या पोटात अन्नाचा एक कणही नसल्याचं अहवालात समोर आलं आहे. अर्थात, मृत्यूपूर्वी किमान ६ ते ७ तास त्यांनी काहीही खाल्लेलं नव्हतं. इतर दोघांच्या रिपोर्टनुसार त्यांनी काही खाल्लं होतं किंवा नाही यासंदर्भात स्पष्टता येऊ शकलेली नाही. शिवाय, त्यांनी पाणीही अत्यंत कमी किंवा अजिबात न प्यायल्याचंही अहवालातून स्पष्ट झालं आहे. कार्यक्रमस्थळी कडक उन्हात आणि उकाड्यात त्यांना बसावं लागल्यामुळे त्यांच्या शरीरात पाण्याची कोणतीही चिन्ह दिसत नव्हती, अशी माहिती शवविच्छेदन प्रक्रियेशी संबंधित एका डॉक्टरांनी इंडियन एक्स्प्रेसला दिली.
“त्यातल्या काहींना पूर्वव्याधीही होत्या. त्यांनी मृत्यूपूर्वी काही तास काही खाल्लेलं नव्हतं किंवा पाणी प्यायलं नव्हत. ४० अंश सेल्सिअस तापमानात ते तिथे बसले होते”, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.दरम्यान, या डॉक्टरांनी मृत्यूमुखी पडलेल्या १४ जणांपैकी एकाला ह्रदयाशी संबंधित आजार असल्याचीही माहिती दिली. एखाद्या व्यक्तीला हायपरटेन्शन किंवा ह्रदयाशी संबंधित आजार असेल, तर अशा व्यक्तीला डीहायड्रेशनचा अधिक त्रास होऊ शकतो असं ते म्हणाले. त्याचप्रमाणे मधुमेहाचा त्रास असणाऱ्यांनाही अशा परिस्थितीचा जास्त त्रास होतो, असंही या डॉक्टरांनी सांगितलं. जर एखाद्या व्यक्तीला सहव्याधी असतील, तर त्यांनी जास्त काळ उन्हात असल्यास नियमित अंतराने काहीतरी खाणं किंवा पिणं आवश्यक आहे