छत्रपती घराण्याचे कोल्हापूर गादीचे वंशज शाहू महाराजांनी आपले पुत्र युवराज संभाजीराजे छत्रपती यांचे उघडपणे कान टोचले आहेत. संभाजीराजेंनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. संभाजीराजेंच्या या सर्व कृतीवर त्यांचे वडील शाहू महाराजांनी नाराजी व्यक्त केली आहे. संभाजीराजे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका करणं, किंवा स्वतंत्र पक्ष काढणं योग्य नसल्याचं शाहू महाराज म्हणाले आहेत.
शाहू महाराज यांनी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना अनेक गोष्टींचा हेतू उलगडा केलेला आहे. यातून त्यांनी थेट संभाजीराजेंना सुनावलं आहे. राज्यसभेच्या जागेवर निवडणूक लढण्यासाठी शिवसेनेकडून अट ठेवण्यात आल्याच्या दाव्यावर त्यांनी भाष्य केलं. तसेच संभाजीराजेंनी स्वतंत्र पक्ष स्थापन करण्याची जी घोषणा केली त्याबाबत कुटुंबियांशी कोणतीची चर्चा केली नसल्याची माहिती शाहू महाराजांनी दिली. तसेच शिवसेनेकडून कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांच्या नावाची उमेदवारी जाहीर झाली तेव्हा आपण त्यांना प्रत्यक्ष फोन करुन अभिनंदन केलं, अशी प्रतिक्रिया शाहू महाराजांनी दिली.
“राज्यसभेवर जाण्याचे जानेवारीपासून त्यांचे प्रयत्न सुरु झाले होते. त्यांची काय योजना होती याची कल्पना काही नव्हती. त्यावेळी देखील चर्चा नाही झाली. पण तिकडे जात असल्याचा निर्णय त्यांनी मला सांगितला. त्याला मी विरोध केला होता पण लोकशाही असल्याने ते कुठेही जाऊ शकतात,” असेही शाहू महाराज म्हणाले.
“आतापर्यंत छत्रपती घराण्याचा निर्णय आहे असं वेळोवेळी सांगत आले, पण त्यांचे निर्णय हे सगळे व्यक्तीगत होते. २००९ पासून त्यांनी वेगळी वाट पकडली
“ड्राफ्ट म्हणजे कच्चा मसुदा होता. पण ते फायनल झालं असतं आणि मग विचार बदलला असता तर म्हणता येईल की शब्द फिरवला. पण वाटाघाडी चालू असताना, ड्राफ्ट स्टेजमध्ये असल्याने नक्की काही ठरलेलंच नव्हतं. जोपर्यंत त्याच्यावर शिक्कामोर्तब होत नाही, सही होत नाही तोपर्यंत काहीच नक्की नव्हतं. पण जिथे ड्राफ्ट शब्द वापरला म्हणजे त्याचा अर्थ ते कच्चे होते, फायनल झाले नव्हतं,” असेही शाहू महाराज म्हणाले.
संभाजीराजेंनी अपक्ष लढावं, ही भाजपची खेळी होती. बहुजन समाजामध्ये फूट पाडण्यासाठी भाजपने ही खेळी केल्याचा मोठा दावा शाहू महाराजांनी केला आहे. तसेच राज्यसभेच्या खासदारकीचा कार्यकाळ संपल्यानंतर संभाजीराजे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना भेटले होते, अशी माहिती शाहू महाराजांनी दिली. फडणवीसांच्या भेटीनंतर संभाजीराजेंनी स्वराज्य पक्षाची स्थापना केली. त्यानंतर त्यांच्यासमोर स्वबळावर लढण्याचा किंवा इतर पक्षांचा पाठिंबा घेण्याचा असे दोनच पर्याय होते. याआधी भाजपने त्यांना राष्ट्रपती नियुक्त सदस्य म्हणून राज्यसभेवर पाठवण्याचा प्रस्ताव दिला होता. तेव्हा आम्ही त्यांना तो प्रस्ताव नाकरण्याचा सल्ला दिला होता. पण त्यांनी ऐकलं नाही. ते राज्यसभेवर गेले. त्यानंतर त्यांनी जे जे राजकीय निर्णय घेतले त्याबाबत आपल्याशी चर्चा केली नाही, अशी माहिती शाहू महाराजांनी दिली.