राज्याच्या सत्तासंघर्षावर लवकर निकाल येणार असल्याची शक्यता आहे. 14 मे आधी निकाल येण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्याच्या सत्तासंघर्षाच्या निकालाकडे राज्यच नव्हे तर अवघ्या देशाचे लक्ष लागलं आहे. 16 मार्च रोजी सत्तासंघर्षाची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या घटनापीठाने आपला निकाल राखून ठेवला आहे. त्यामुळे हा निकाल कधी लागणार, याकडे आता सर्वांच्या नजरा वळल्या आहेत.
आतापर्यंतचा इतिहास पाहता एखाद्या मोठ्या प्रकरणाचा निकाल राखून ठेवल्यानंतर साधारण महिनाभरात न्यायालयाकडून त्याचा निकाल जाहीर केला जातो. सर्वोच्च न्यायालयाने सत्तासंघर्षाचा निकाल राखून ठेवला आहे, त्याला येत्या 16 एप्रिल रोजी एक महिना पूर्ण होईल. त्यामुळे लवकरच हा निकाल लागण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे, 20 मे पासून सुप्रीम कोर्टाच्या उन्हाळी सुट्ट्याही सुरु होत आहेत. 20 मे ते 2 जुलै अशी सुप्रीम कोर्टाची सुट्टी असणार आहे. त्यामुळे एप्रिल शेवटचा आठवडा किंवा मे च्या पहिल्या आठवड्यापर्यंत कधीही निकालाची शक्यता आहे, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. सत्तासंघर्षाच्या या निकालावरच महाराष्ट्राचे राजकीय भवितव्य अवलंबून आहे