२०२४ पर्यंत अधिकची दोन लाख रिक्त पदे भरण्याचा मानस
महाविकास आघाडी सरकार हे राज्यातील सामान्य जनतेचे हित नजरेसमोर ठेवून स्थापन झालेले सरकार आहे. शेतकऱ्यांपासून सर्वसामन्यांपर्यंत प्रत्येक घटकाचा विचार करताना आता राज्यातील सुशिक्षित बेरोजगारांना नोकरी मिळण्यासाठी राज्य सरकारने मोठे पाऊल टाकले आहे. टप्प्याटप्प्याने पदभरती करण्याचे नियोजन असून २०२२च्या अखेरपर्यंत राज्यात एक लाख पदभरती करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. मागील सरकारच्या काळात काही ना काही कारणाने शासकीय भरती झालेली नाही. ही सर्व रिक्त पदे भरून काढण्याची भूमिका महाविकास आघाडी सरकारने घेतली आहे. त्यामुळे आता प्रत्येक विभागांकडील मंजूर व रिक्तपदांची आरक्षण पडताळणी अंतिम करण्याचे काम सुरु आहे.
दरम्यान, महाविकास आघाडी सरकारने दोन लाख शासकीय पदांची भरती करण्याचे नियोजन केले असून ही भरती प्रक्रिया राज्य, विभागीय व जिल्हा स्तरावर राबविली जाणार आहे. जिल्हा परिषदांसह शासनाच्या विविध विभागांमधील रिक्तपदांचा त्यात समावेश असेल, अशी माहिती राज्यमंत्री ना. दत्तात्रेय भरणे यांनी दिली आहे.