शरद पवारांच्या ‘त्या’ भूमिकेमुळे अजितदादांऐवजी एकनाथ शिंदे झाले मुख्यमंत्री…

0
27

राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळत असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या ५४ पैकी ५१ आमदारांची भाजपसोबत जाऊन सत्ता स्थापन करण्याची इच्छा होती. त्यावेळी आमदारांनी पत्र लिहून शरद पवारांकडे आपला मानस व्यक्त केला. पण पवारांनी निर्णय घेतला नाही. याच संधीचा फायदा एकनाथ शिंदेंनी घेतला, असा गौप्यस्फोट राज्यसभेचे खासदार प्रफुल पटेल यांनी केला आहे. पटेल यांनी टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत अनेक महत्त्वाच्या घडामोडींची माहिती दिली. २०२२ मध्ये उद्धव ठाकरे सरकार कोसळत असताना पक्षात काय सुरू होतं, याचा संपूर्ण घटनाक्रम त्यांनी कथन केला. ‘ठाकरे सरकार कोसळणार हे निश्चित झालं असताना राष्ट्रवादीच्या आमदारांनी पवारांना एक पत्र लिहिलं होतं. आपण भाजपसोबत जायला हवं अशी आमदार आणि कार्यकर्त्यांची इच्छा आहे असा उल्लेख त्या पत्रात होता. अनेक आमदारांना निधी मिळत नाही. शेतकऱ्यांच्या समस्या सोडवता येत नाहीत. अशा परिस्थितीत सरकारमध्ये सामील झाल्यास आमदारांच्या समस्या सुटतील, असं पत्रात नमूद करण्यात आलं होतं,’ असा दावा पटेलांनी केला. पण पवारांनी निर्णय घेतला नाही आणि शिंदेंनी संधी साधली. ते मुख्यमंत्री झाले, असं पटेल म्हणाले. पवारांनी निर्णय घेतला असता तर आज शिंदे नव्हे, अजित पवार मुख्यमंत्री असते, याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न पटेल यांनी केला.