नगर तालुक्यात शेतीच्या वादातून एकाचा खून, दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

0
20

नगर तालुक्यातील वाळकी गावच्या शिवारात शेतातून जाणाऱ्या रस्त्याच्या वादातून झालेल्या मारहाणीत मोहन खिराजी दांगडे (वय ६५, रा. हंदार मळा, वाळकी, ता. नगर) यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून कुठे तरी पळून जात असताना या आरोपींना नगर तालुका पोलिसांनी नेवासा तालुक्यातील चांदा येथे पकडले आहे.

या प्रकरणी मयताचा मुलगा संतोष मोहन दांगडे (वय ३०, रा. वाळकी, ता.नगर) यांनी नगर तालुका पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी राजु आण्णा काकडे (वय २५) व बजरंग बाबुराव काकडे (वय २२. दोघे रा.वाळकी, ता.नगर) यांच्या विरुद्ध भा.दं.वि.कलम ३०२, ५०४, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. ही घटना गुरुवारी (दि.४) सकाळी वाळकी गावच्या शिवारात धनगर वाडी रोड वर घडली होती. मयत मोहन दांगडे यांचा दोघा आरोपींसोबत रस्त्यावरून वाद झाला त्यावेळी आरोपी बजरंग काकडे याने मोहन दांगडे यांची गचांडी धरून मारहाण केली तर राजु काकडे यांने लोखंडी गज घातलेल्या ठिबकच्या पाईने बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत दांगडे यांचा मृत्यू झाला होता.

या प्रकरणी रात्री उशिरा नगर तालुका पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान या घटनेनंतर दोन्ही आरोपी वाळकी गावातून पसार झाले. त्यांच्या शोधासाठी नगर तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रल्हाद गिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे, पोलिस अंमलदार सुभाष थोरात, विक्रांत भालसिंग, संभाजी बोराडे, कमलेश पाथरूट, राजु खेडकर, सागर मिसाळ यांचे पथक रवाना झाले होते. या पथकाला आरोपी नेवासा तालुक्यातील चांदा येथे असल्याची माहिती मिळाली. या पथकाने चांदा येथे जावून दोन्ही आरोपींना पकडले आहे.