बॉलिवूडचा किंग असणारा शाहरुख खान कुठेही गेला तरी त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते. मात्र बांद्रा कलेक्टरांनी हे चित्र २००२ सालीचं बदललं होतं. कायदा हा सगळ्यांसाठी सारखाच असं म्हणत त्यांनी चक्क शाहरुखला सर्वसामान्यांप्रमाणे कर भरण्यासाठी ऑफिसबाहेर बाकड्यावर बसवून ठेवलं होतं. रत्नागिरीत दापोली येथे पार पडलेल्या एका कार्यक्रमात कोकणातील ज्येष्ठ तलाठी संजय गावकर यांनी हा किस्सा सांगितला आहे.
२००२ साली राज्यातील सहा महसुल विभागात कोकण विभाग अव्वल आला होता. बारा हजार पाचशे कोटी रुपये महसुल जमा झाला होता. जूही चावला व शाहरुख खान यांचं फिल्म प्रोडक्शन संस्थेचं ऑफिस आरे येथे होतं. अनेक नोटिसा पाठवून वसुली होत नव्हती. अखेर ते ऑफिस सील केलं. त्यानंतर काहीसा चिडलेला शाहरूख बांद्रा येथे आला. त्यावेळी तत्कालीन जिल्हाधिकारी एन संदीपराव यांनी त्याला इतरांप्रमाणे ऑफिसबाहेर बाकड्यावर बसवून ठेवलं. कोणाच्याही दबावाला न घाबरता क्षत्रिय यांनी शासनाची वसुली करून घेतली होती. शाहरुखची तेव्हा तब्बल १०० कोटींची कर थकबाकी होती.
शाहरुखने इतरांप्रमाणे ऑफिसमध्ये येऊन मग कर भरला. त्यानंतरच संदीपराव यांनी त्याच्या कार्यालयाला लावलेलं सील हटवलं. हा किस्सा तेव्हाचे उप आयुक्त स्वाधीन क्षत्रिय यांनी २००२ साली सांगितला होता, तो आजही आपल्या लक्षात आहे असं गावकर म्हणाले. अधिकारी कसा असावा याचं उदाहरण त्यांनी घालून दिलं.






