सोलापूर: शिवसेनेकडे मुख्यमंत्री पद असूनही महाविकास आघाडीत शिवसेनेला दुय्यम स्थान मिळत असल्याची चर्चा नेहमीच होते. शिवसेनेतील काही नेते जाहीरपणे ही खंत मांडत असतात. आता शिवसेनेचे माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांनीही ही खदखद पक्षाच्या व्यासपीठावर मांडली आहे. सोलापुरात युवा सेनेचे वरूण सरदेसाई यांच्या उपस्थितीत मेळावा झाला. सावंत म्हणाले की, राज्यात महाविकास आघाडी सरकार चालवत असताना गेल्या अडीच वर्षात शिवसेनेला दुय्यम वागणूक मिळत असून सरकारच्या अर्थसंकल्पातही हेच दिसून आले आह. जेथे जेथे शिवसेनेची ताकद आहे, तेथे शिवसैनिकांचा दाबण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून होत आहे. जर अशाप्रकारे अन्याय होणार असेल तर शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनी आघाडीबाबत फेरविचार करायला हवा, असे परखड मत त्यांनी व्यक्त केले.
सोमवारी सोलापुरात हुतात्मा स्मृतिमंदिरात आयोजित युवासेना मेळाव्यात सावंत बोलत होते. युवा सेनेचे सचिव वरूण सरदेसाई यांच्या उपस्थितीत हा मेळावा झाला.
तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यावर आक्रमक शैलीत टीकेचे बाण सोडले. “राष्ट्रवादी आणि काँग्रेस दोघेही शिवसेनेबरोबर सत्तेत आहेत ना, तर मग शिवसेनेवर कशाला अन्याय करता? आम्हांला सत्तेत बसायची सवयच नाही. शिवसेना तर विस्थापितांचा गट आहे. तसे कोणी अजमावून पाहू नये. सरकारच्या अर्थसंपल्पातदेखील शिवसेनेला दुय्यम-तिय्यम स्थान मिळते. अर्थसंकल्पात ६०-६५ टक्के निधी राष्ट्रवादीला तर ३०-३५ टक्के निधी काँग्रेसला मिळतो. फक १६ टक्के एवढाच निधी शिवसेनेला मिळतो. महाविकास आघाडीत एकत्रपणे मांडीला मांडी लावून बसतात आघाडी धर्म पाळायच्या नुसत्या गप्पा मारल्या जातात. मात्र दुसरीकडे शिवसेनेची मुस्कटदाबी केली जाते. आम्ही केवळ आदेशाची वाट पाहतोय. जोपर्यंत सहन होईल, तोवर सहन करू. राष्ट्रवादी आणि काँग्रेसने आमच्या नादी लागू नये. तुम्ही आम्हाला शंभर मारले आणि मग आमचा एकच दणकट मार बसला की तुम्हांला आईचे दूध आठवेल, असा इशारा त्यांनी दिला.