नगर : ग्रामीण भागात बर्याचदा 2 ते 12 तासच वीज उपलब्ध असते. तिही बर्याचदा रात्री उपलब्ध असते. देखभालीच्या अडचणीमुळे कधीकधी काही दिवसासाठीही वीज पुरवठा बंद राहतो. यामुळे शेतकरी अडचणीत येत असून शेतकर्यांना सोलर वीजेवर पाणी पंप चालवण्याचा उत्तम पर्याय आहे. यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सोलर पॉवर्ड पंप सिस्टिम करीता मुदतीचे कर्ज देणार असल्याची माहिती बँकेचे चेअरमन उदय शेळके यांनी दिली.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नगर तालुक्यातील आगडगाव विस्तार कक्षाच्या स्थलांतर प्रसंगी चेअरमन शेळके बोलत होते. जिल्यातील शेतकरी दुष्काळी भागात जरी असला तरी या शेतकर्यांना बँकेची नियमित कर्जफेड करण्याची सवय आहे. त्यांच्या प्रगतीत खंडीत व शाश्वत विज पुरवठा नसल्याने अशा प्रगतशील शेतकर्यांना सोलर पॉवर्ड पंपाव्दारे शेती करण्यासाठी जिल्हा बँकेने 3 एचपी ते 10 एचपी पर्यत पंपाना 7 ते 10 वर्षाच्या परतफेड कालावधीकरीता योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
याप्रसंगी जिल्हा बँकेचे जेष्ठ संचालक माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले म्हणाले, जिल्हा बँकेने ग्रामिण भागातील शेतकर्यांची आर्थिक उन्नती केली असून बँकेने नुकतेच पीक कर्ज मर्यादा 30 हजार पर्यंत देण्याची शिफारस उच्च कमिटीकडे केली आहे. नगर तालुक्यातील शाखामध्ये जवळपास 2 हजार कोटीच्या ठेवी असुन जिल्हयात शेतकर्यांसाठी गायांच्या खेळते भांडवल कर्जासाठी जवळपास 350 कोटींचे वाटप केले आहे. त्यांची वसुलीही चांगली असुन शेतकर्यांनी 100 टक्के वसुल दिल्यास ही योजना पुढे चालू ठेवण्याचा विचार जिल्हा बँक संचालक मंडळाचा असल्याची माहिती कर्डिले यांनी दिली.