मुंबई: खासदार संभाजी छत्रपती यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस असून उपोषणाला बसलेल्या संभाजी राजे यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांचा चेहरा सुकलेला दिसत असून चेहऱ्यावर थकवा जाणवत आहे. मात्र, सरकारकडून अजूनही कोणतंही ठोस आश्वासन देण्यात आलेलं नाही. संभाजी छत्रपती यांनी आज कार्यकर्त्यांशी संवाद साधला. तब्बल 12 मिनिटे 28 सेकंद त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत त्यांना मार्गदर्शन केलं. बोलत असताना त्यांचा आवाज क्षीण झालेला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दैदिप्यमान कार्यावर बोलत असताना अचानक त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. त्यामुळे त्यांनी तात्काळ हाताने डोळे पुसण्यास सुरुवात केली. अनपेक्षितपणे घडलेला हा प्रसंग पाहून आझाद मैदानात जमलेले शेकडो कार्यकर्तेही हेलावून गेले. राजेंच्या डोळ्यात अश्रू आलेले पाहून संपूर्ण परिसरात शांतता पसरली होती. कार्यकर्तेही गहिवरून गेले होते.
रामकृष्ण हरी. मी काय बोलावं? संत तुकाराम महाराज असतील, ज्ञानोबा असतील नामदेवराव महाराज असतील आणि विठ्ठल-रुक्मिणीचा आशीर्वाद घेण्यासाठी हे सगळे संत असतील आणि आपण सगळेजण. शिवाजी महाराजांनी भक्ती-शक्ती केल्यामुळे हे स्वराज उभं राहिलं आणि तो आशीर्वाद (राजेंच्या डोळ्यात पाणी)… मी छत्रपती शिवाजी महाराज, तुकोबांनी त्यांची ताकद वारकरी संप्रदायाने दिली होती. तिचं ताकद देण्यासाठी आपण इथे आलात, मी मनापासून आपला ऋणी आहे. छत्रपती केव्हा रडत नाहीत (डोळे पुसतात, तेव्हा कार्यकर्त्यांच्या जोरदार घोषणा सुरू होतात) पण छत्रपतींच्या डोळ्यात केव्हा अश्रू नसतात. तुमची भक्ती आणि आमची शक्ती यांने स्वराज निर्माण होतं. आपण तेच स्वराज निर्माण करण्यासाठी आलात, तुम्हा सर्वाचं आभार, असं संभाजी राजे म्हणाले.