काँग्रेसचा अजेंडा हा आहे की त्यांचं सरकार आलं तर ते काश्मीरमध्ये कलम ३७० परत लागू करतील. सीएए रद्द करतील असं सांगत आहेत. काँग्रेस आणि इंडि आघाडीकडून हे लांगुलचालन केलं जातं आहे, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोल्हापूरच्या सभेत काँग्रेसवर जोरदार टीका केली. ज्या लोकांची लोकसभा निवडणूक तीन अंकी संख्या गाठेपर्यंत दमछाक होणार आहे असे लोक सरकार आणू शकतात का? असा प्रश्नही मोदींनी विचारला.
डीएमके हा काँग्रेसचा जवळचा पक्ष त्यांनी काय म्हटलं? सनातन धर्म डेंग्यूसारखा आहे. अशा लोकांचा सत्कार काही लोक महाराष्ट्रात बोलवून करतात. हे पाहून बाळासाहेब ठाकरेंच्या आत्म्याला किती यातना होत असतील. छत्रपती शिवरायांच्या भूमीत जे औरंगजेबाला मानतात अशा लोकांशी उद्धव ठाकरेंनी हातमिळवणी केली आहे. नकली शिवसेना या सगळ्या अजेंड्यात काँग्रेसच्या खांद्याला खांदा लावून चालते आहे. बाळासाहेब ठाकरेंचा आत्मा तळतळत असेल. जे काही कारनामे चालले आहेत ते पाहून त्यांच्या आत्म्याला यातना होत असतील असं म्हणत मोदींनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली.