‘महानंद’ची गोरेगाव येथील ५० एकर मोक्याच्या ठिकाणची जागा अदानी यांना विकण्याचा डाव असल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर केला होता. त्याला विखे पाटील यांनी उत्तर दिले असून राऊत यांनी हा आरोप सिद्ध करून दाखविला तर राजकारणातून संन्यास घेऊन अन्यथा राऊत यांच्याविरूद्ध न्यायालयात अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार आहे, अशी प्रतिक्रिया विखे पाटील यांनी व्यक्त केली.
विखे पाटील यांनी नगरमध्ये प्रसार माध्यमांशी संवाद साधला, ते म्हणाले, मी वारंवार सांगत आलेलो आहे खासदार संजय राऊत यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. ते जी मुक्ताफळे उधळत आहेत, खरेतर त्यांना मानसोपचार तज्ज्ञाची गरज आहे. ते कोणत्या ५० एकर जमिनीचे आरोप करत आहेत, हे त्यांनाच माहिती. मी आत्तापर्यंत पुष्कळ सहन केले तसेच काही पथ्य देखील पाळत आलो आहे. परंतु ते महानंदबाबत बेताल वक्तव्य करत असेल तर त्यांनी त्याचे परिणाम भोगायला तयार राहावे.