कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदासाठी ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या जवळच्या व्यक्तीची निवड झाल्यामुळे संतापलेल्या कुस्तीपटू बजरंग पुनिया याने मोठा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिताना त्याने त्याचा पद्मश्री पुरस्कार परत करण्याची घोषणा केली आहे.
काय करावे, कुठे जावे आणि कसे राहावे, हे समजत नसताना आपण आपली रात्र रडत घालवली, असे पुनियाने आपल्या पत्रात म्हटले आहे. ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू बजरंग पुनिया यानी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पद्मश्री पुरस्कार परत करण्याबाबत माहिती दिली. त्याने पंतप्रधान मोदींना उद्देशून एक पत्र देखील पोस्ट केले, ज्यामध्ये त्याने ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या जवळच्या व्यक्तीने निवडणूक जिंकल्यामुळे आपण दुखावलो गेल्याची भावना व्यक्त केली आहे.