छगन भुजबळांना फडणवीसांनी जरांगेंना विरोध करण्यासाठी उभं केलं ! आता छातीत कळ…

0
8

आज जालना या ठिकाणी छगन भुजबळ यांनी सभा घेतली. ओबीसी आरक्षण कसं महत्त्वाचं आहे हे छगन भुजबळ यांनी सांगितलं. तसंच आपल्या भाषणात मनोज जरांगे पाटील यांच्यावर भुजबळांनी जोरदार टीका केली. कुठल्या दगडाला तुम्ही शेंदूर फासला आहे ? असा प्रश्न छगन भुजबळ यांनी विचारला आहे.
“या महाराष्ट्रातील किती तरी नेते मराठा नेते आहेत. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शरद पवार, विलासराव देशमुख, शंकरराव चव्हाण असे कितीतरी नेते मराठा समाजाचे आहेत. मात्र, त्यांनी सर्वांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका घेतली. त्यांनी घरं जाळण्याची भूमिका घेतली नाही. या महाराष्ट्रात आजही खूप मराठा नेते आहेत. मराठा तरुणांना मला सांगायचं आहे की, याच्या कुठं मागे लागले, या दगडाला शेंदूर लावून हा कुठला देव झालाय. याला कळेना, ना वळेना. लेकरं, लेकरं करतात. मात्र, आमचीही लेकरं आहेत. त्यांनी वेगळं आरक्षण घ्यावं.”
जालन्यातल्या या भाषणानंतर अंजली दमानिया यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत छगन भुजबळांना देवेंद्र फडणवीसांनी मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात उभं केलं आहे असा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे.

“कुठेतरी असे वाटते की भुजबळांना फडणवीसांनी जरंगेंना विरोध करण्यासाठी उभं केलं आहे. आता तवा तवाने भुजबळ कसे बोलतात पाहा …. आता छातीत कळ नाही येत ? जेल मधून बाहेर येण्यासाठी अगदी गरीब बिचारे बनण्याचा आव आणायचे.” असं अंजली दमानियांनी म्हटलं आहे.