शहरातून वाहणार्या गोदावरी नदीवरील लहान पुलावरून एका शालेय विद्यार्थिनीने सोमवारी संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास नदीपात्रात उडी मारली पुलावरून जाणार्यांच्या ही बाब लक्षात आल्यावर त्यांनी तेथे गर्दी केली. दरम्यान शहरातील आपदा मित्र असलेल्या तरुणांना ही बाब कळताच जवळच असलेले युवक दिपक थोरात, सोमनाथ आहेर, संतोष वायदंडे, संजय जगधने, किरण सिनगर, विजू मरसाळे आणि सुषमा खिलारी हे त्याठिकाणी पोहोचले. यातील काही जणांनी वाहत्या पाण्यात उडी मारून पुलापासून काही अंतरावर वाहून जात असतांना सदर मुलीला पकडले आणि पाण्याबाहेर काढत तिचे प्राण वाचवले.
अचानक पुलावर गर्दी झाल्याने शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी सुशील शिंदे तसेच शिर्डी पोलीस स्टेशनचे कर्मचारी रामेश्वर वेताळ हे पुलावरून जात असताना ते देखील मदतीसाठी नदीपात्रात उतरले. या तरुणांच्या सतर्कतेने सदर शालेय विद्यार्थिनीचे प्राण वाचले आहे. तरुणांच्या या धाडसामुळे मुलीचे प्राण वाचल्याने नागरिकांकडून या तरुणांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.