राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर बारामतीमध्ये गोंधळाची परिस्थिती आहे. थोरल्या साहेबांना साथ द्यावी की, अजित पवारांबरोबर राहावं, अशा संभ्रमात लोक दिसत आहेत. आता बारामतीमध्ये एक निनावी पत्र व्हायरल झालं आहे. “बारामतीकरांची भूमिका” या नावाने हे पत्र व्हायरल झाले आहे. राजेंद्र पवारांची क्षमता असूनदेखील अजित पवारांना पुढे केले” तसेच तिसऱ्या पिढीत राजकारणात येण्याचा अधिकार रोहित पवार यांना होता, ते राजकारणात आल्यानंतर जळफळाट सुरू झाला, असा उल्लेख या पत्रात करण्यात आलेला आहे.
काय आहे पत्रात…
अजित दादा पवार यांनी हे प्रकरण विनाकारण भाव भावकीच्या तालावर आणून ठेवले
पवारांच्या घरात शेतकरी कामगार पक्षाचे राजकारण होतं. स्वर्गीय शारदाबाई पवार या त्या वेळीच्या लोकल बोर्डाच्या मेंबर म्हणून निवडून आल्या होत्या. नंतर आप्पासाहेब पवार (रोहित पवारांचे आजोबा) आपले बंधू शरद पवार यांच्यासोबत शेकापाचं काम करू लागले. पण शरदरावांचा ओढा काँग्रेसकडे होता. याच पक्षात ते पुढे जात राहिले आणि आप्पासाहेबांनी शेतीकडे मोर्चा वळवला. पुढची पिढी जेव्हा राजकारणात तयार होत होती तेव्हा स्वर्गीय अनंतरावांचा मुलगा अजित आणि आप्पासाहेबांचा मुलगा राजेंद्र यांच्यापैकी कोणाला राजकारणात पाठवायचे याबाबत विचार होत होता. तेव्हा दोन्ही भावांनी आनंदरावांच्या मुलांसाठी काहीतरी केलं पाहिजे म्हणून राजेंद्र पवारांची क्षमता असून देखील अजित पवारांना पुढे केले. दोघांनीही त्यांना वेळोवेळी सांभाळून देखील घेतले. तेव्हा राजेंद्र पवार यांनी बंड केले नाही. पुढचा इतिहास माहीतच आहे पण तिसऱ्या पिढीत जेव्हा पार्थ की रोहित अशी निवड करायची ठरली तेव्हा आप्पासाहेबांचा थेट वारसदार म्हणून रोहितची निवड करून अप्रत्यक्षपणे राजेंद्र पवार यांना न्याय देण्यात आला. तिथपासून खरा जळफळाट सुरू झाला होता. सुप्रिया सुळे यांची कार्याध्यक्षपदी निवड झाल्यानंतर धाराशिवच्या काड्या पेटल्या आणि तोफांना बत्त्या लागल्या म्हणूनच सर्वसामान्य बारामतीकारांची हीच भूमिका आहे वाजवा तुतारी गाडा गद्दारी.






