Raju Shetti…मुंबई – स्वाभिमानी शेतकरी संघटनेने महाविकास आघाडीतून बाहेर पडत असल्याची घोषणा केली. त्यानंतर आता राजू शेट्टी यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची भेट घेतली आहे. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त बारा विधानपरिषद सदस्य नेमण्यासाठी मंत्रिमंडळाचा ठराव करून बारा व्यक्तींच्या नावाची शिफारस राज्यपालांच्याकडे करण्यात आलेली आहे. त्या यादीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेटटी यांचे सामाजिक, कृषी व सहकार या विभागातील माहितीगार व अनुभवी व्यक्ती म्हणून शिफारस होती.
यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, बारा आमदारांच्या नियुक्तीवरून महाविकास आघाडी व भारतीय जनता पक्ष यांच्यामध्ये झालेले आरोप, प्रत्यारोप, कुटील व गलिच्छ राजकारण यामुळे महाराष्ट्रातील राजकीय व सामाजिक वातावरण अतिशय गढूळ झालेले आहे. राज्यपाल नियुक्त आमदार म्हणजे चेष्ठा व टिंगल टवाळीचा विषय झालेला आहे असं त्यांनी म्हटलं.महाविकास आघाडी सरकारकडून सरकार स्थापनेपासून घटक पक्षांना विश्वासात न घेता राज्यकर्त्यांच्या फायद्यासाठी जाणीवपुर्वक शेती , सहकार या क्षेत्रात चुकीचे घोरणे राबविले जात आहेत. यामुळे या सरकारच्या शिफारशीवरून विधानपरिषद सदस्यत्व स्विकारणे मला नैतिकदृष्ट्या अयोग्य वाटते. म्हणून, यादीतून माझे नाव वगळण्यात यावे असे लेखी पत्राद्वारे कळविले आहे.