तेलंगणाच्या भोनगीर लोकसभा मतदारसंघात भाजपा उमेदवारासाठी आयोजित प्रचारसभेत बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दावा केला आहे की, भाजपा सत्तेत आल्यास आम्ही मुस्लिम आरक्षण रद्द करू आणि अनूसुचित जाती, अनूसुचित जमाती आणि इतर मागासवर्गीयांचं (ओबीसी) आरक्षण वाढवू.
अमित शाह म्हणाले, काँग्रेस खोटं बोलून, अफवा पसरवून निवडणुका लढू आणि जिंकू पाहत आहे. ते लोक म्हणतात की भाजपा पुन्हा सत्तेवर आली, नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर ते आरक्षण संपवून टाकतील. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गेल्या १० वर्षांपासून या देशाचं नेतृत्व करत आहेत. त्यांनी कधी तसा विचारही केला नाही. १० वर्षांत आम्ही आरक्षणाला गालबोटही लावलं नाही. काँग्रेस पक्षाने मात्र मुसलमानांना चार टक्के आरक्षण देऊन अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीयांचं आरक्षण कमी केले काँग्रेसने एक प्रकारे मागासवर्गीयांच्या आरक्षणावर दरोडा टाकला आहे.