उन्हाळ्यात शाळा सुरू ठेवण्याच्या निर्णयाला महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचा विरोध
शिक्षण विभागाच्या निर्णयाला अहमदनगर कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचा विरोध
नगर – एप्रिलपर्यंत शाळा पूर्णवेळ सुरू ठेवण्याच्या व उशिरा परीक्षा घेण्याबाबत गुरुवारी जारी केलेल्या शिक्षण विभागाच्या निर्णयाला शिक्षण वर्तुळातून प्रचंड विरोध होत आहे. तज्ज्ञांमधून या निर्णयाविरोधात संताप व्यक्त असून शालेय शिक्षण विभागाने सर्व जिल्ह्यांतील भौगोलिक, शैक्षणिक परिस्थितीचा पूर्णपणे विचार न करता हा निर्णय घेतला असून याला महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने तीव्र विरोध केला असून सदर निर्णय मागे घेण्याची मागणी शालेय शिक्षण मंत्री तसेच मुख्यमंत्र्यांना संघटनेने केली असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष डॉ. नवनाथ टकले व प्रा. सतीश शिर्के यांनी दिली आहे.
शिक्षण विभागाचे हे परिपत्रक म्हणजे वरातीमागून घोडे असल्याची भावना व्यक्त होत आहे. आणि ठिकाणी शिक्षकांनी ज्यादा काम करून अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. अनेक ठिकाणी अंतर्गत मूल्यमापन पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. तसेच बहुसंख्य शाळा आणि ज्युनिअर कॉलेजनी परीक्षांचे नियोजन केले आहे. काही ठिकाणी परीक्षा सुरू झाल्या आहे. पालकांनी गावी जाण्यासाठी रेल्वेचे आगाऊ आरक्षणदेखील केले आहे, शिक्षण विभागाच्या परिपत्रकामुळे शाळांची परीक्षांची तयारी वाया जाणार आहे. पालकांना आर्थिक झळ सोसावी लागणार आहे. अशा परिपत्रकामुळे विद्यार्थी पालक व शिक्षक वर्गात संभ्रम निर्माण होत आहे.
परीक्षा सोयीनुसार घेऊ द्या. शैक्षणिक वर्ष १ मे रोजी समाप्त करून २ मे पासून शाळांना सुट्टी जाहीर करावी.अशी मागणी राज्य संघटनेचे मार्गदर्शक भास्करराव ज-हाड, प्रा.आश्रुबा फुंदे, प्रा. मच्छिंद्र दिघे, प्रा. सोपानराव कदम, प्रा. दिलावर पठाण, प्रा.कमलाकर शिंदे, प्रा. संजय कोल्हे, प्रा. प्रतापराव काळे, प्रा. राजू रिक्कल, प्रा. रवींद्र देवढे, प्रा. अविनाशकुमार झावरे, प्रा. विठ्ठल दहिफळे यांनी केली आहे.