महाविकास आघाडी सरकारवर सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप करणारे भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या निशाण्यावर आता युवासेना प्रमुख आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आले आहेत. किरीट सोमय्या यांनी ईडीने केलेल्या कारवाईच्या अनुषंगाने थेट ठाकरे कुटुंबावर हल्लाबोल केला आहे. सगळी प्रकरणे समोर आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची रात्रीची झोप उडणार असल्याचेही किरीट सोमय्या यांनी म्हटले.
ईडीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या मालकीची सुमारे 6 कोटींची मालमत्ता जप्त केली. ईडीने मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकांवर कारवाईने केल्याने मोठी खळबळ उडाली होती. किरीट सोमय्या यांनी आज पत्रकार परिषदेत ठाकरे कुटुंबावर आरोप करताना म्हटले की, ठाकरे कुटुंबीय आणि अन्वय नाईक यांच्या जमिनी व्यवहाराबाबत माहिती दिली होती. त्याबाबत मुख्यमंत्र्यांनी कोणतेही भाष्य केले नाही. आता ईडीच्या कारवाईबाबत तरी बोलतील का, असाही सवाल त्यांनी केला.