मुंबई : 23 फेब्रुवारी 1878 रोजी बुलडाणा येथील शेगाव येथे गजानन महाराज लोकांच्या दृष्टीस पडले. बिरुदुराजू रामराजू नावाच्या एका लेखकाने ‘आंध्रा योगुलु’ नावाच्या पुस्तकात गजानन महाराज तेलंगी ब्राह्मण असल्याचे लिहिले आहे. ‘गण गण गणात बोते’चा गजर, अभिषेक, पालखी, पारायण अशा धार्मिक वातावरणात श्री गजानन महाराज प्रकट दिन सोहळा साजरा करण्यात येतो. गजानन महाराज परमहंस संन्यासी, जीवनमुक्त होते. भक्तांचा उद्धार करण्याची त्यांची एक विशिष्ट शैली होती. काहीच न बोलता ते सर्व काही बोलून जात असत. भक्तांवर असीम कृपेचे छत्र धरून ते भक्तांच्या ह्रदयात घर करत, असा सर्व भक्तांचा अनुभव होता. ‘गण गण गणात बोते’, हा त्यांचा आवडता मंत्र. ते याचा अखंड जप करत असत.
अकोल्यात शिवजयंतीनिमित्त झालेल्या एका सभेला, टिळकांबरोबर गजानन महाराजही व्यासपीठावर बसले होते. लोकमान्य टिळकांना कैद झाली, त्यावेळी महाराजांनी त्यांच्याकरिता भाकरीचा प्रसाद पाठविला आणि भविष्य वर्तवले की, टिळकांना शिक्षा अटळ आहे. महाराजांच्या भविष्यवाणीनुसार, ब्रह्मदेशातील मंडालेच्या तुरुंगात टिळकांनी ‘गीतारहस्य’ ही भगवदगीतेवर टीका लिहिली. आपल्या अवतारकार्यातील ३२ वर्षांचा काळ गजानन महाराजांनी संपूर्णपणे शेगावात व्यतीत केला.
श्री गजानन महाराज प्रगट दिन विशेष…लोकमान्य टिळकांसाठी महाराजांनी पाठवला होता भाकरीचा प्रसाद
- Advertisement -