नगर :- जिल्हयातील विविध शासकीय विभागाच्या विभाग प्रमुखांनी आपल्या विभागामध्ये नाविण्यपूर्ण उपक्रम राबवून शासनाची प्रतिमा जनसामान्यात अधिक उंचविण्यासाठी प्रयत्न करावे. असे प्रतिपादन अहमदनगर जिल्हयाचे पालक सचिव श्री. सुमंत भांगे यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीच्यावेळी श्री. भांगे मंत्रालयातून दूरदूष्य प्रणालीव्दारे बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातून जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षिरसागर, पोलीस अधिक्षक मनोज पाटील, महापालिका आयुक्त शंकर गोरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता जयंत कुलकर्णी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, निवासी उप जिल्हाधिकारी संदीप निचित, जिल्हा नियोजन अधिकारी निलेश भदाणे आदी विभाग प्रमुख उपस्थित होते.
पालक सचिव श्री. भांगे म्हणाले अहमदनगर जिल्हा हा कृषि क्षेत्रात प्रगतशिल जिल्हा असून जिल्हयात कृषि विभागांतर्गत विविध योजना राबविल्या जातात या योजनेंचा लाभ शेतक-यांना होण्यासाठी कृषि विभागाने वेगवेगळया कार्यशाळेचे आयोजन करुन बाजारात जे विकले जाईल ते अधिक प्रमाणात पिकविण्यासाठी शेतक-यांना मार्गदर्शन करावे जिल्हयात आदर्श शेतकरी होण्याच्या दृष्टीने त्यांना आधूनिक शेतीप्रक्रीये बद्दल मार्गदर्शन करावे. जिल्हयातील प्रगतशील शेतक-यांचा या कामासाठी उपयोग करुन घ्यावा जिल्हयात . कृषि क्षेत्रात अधिक प्रगती काशी होईल याबाबत विभागाने नियोजन करणे आवश्यक आहे. कृषि क्षेत्रबरोबरच पशुसंवर्धन विभागानेसुध्दा शेतक-यांचे हित लक्षात घेवून नाविण्यपूर्ण कामांवर भर दिला पाहिजे. असे त्यांनी सांगितले.
श्री. भांगे पुढे म्हणाले महानगर पालिकेने शहरातील कामांची गुणवत्ता तपासण्यावर भर द्यावा. संपूर्ण शहरात चांगले रस्ते होती याकडे लक्ष द्यावे. शहरात पाणीपुरवठा योग्य प्रकारे कसा होईल याचे नियोजन करुन नागरिकांना चोवीसतास पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी पाणी मिटर पध्दत सुरु करता येईल का याचाही विचार करावा. शहरातील ड्रिनेज दुरुस्ती, घनकचरा व्यवस्थापन याकडेही लक्ष देण्याच्या सुचना ही त्यांनी दिल्यात. समाज कल्याण विभागाने जात पडताळणी समित्याचे कामकाज अधिक जलद गतीने होण्यावर भर द्यावा व जात पडताळणी प्रकरणांचा लवकर निपटारा करावा. सामाजिक न्याय विभाच्या वसतीगृहाची तपासणी करुन विद्यार्थ्यांना चांगला आहार मिळतो आहे का याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. महसूल विभागाने लोकांच्या तक्रारी समजावून घेवून त्या सोडवाव्यात. लोकांच्या तक्रारींकडे अधिक लक्ष द्यावे. अहमदनगर जिल्हयाची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी कोतवालापासून ते अधिका-यापर्यंत, नागरिकांमध्ये आदरयुक्त भावना निर्माण झाली पाहिजे. यासाठी सर्वांनी मनापासून काम केला तर त्याचे सकारात्मक परिणाम आपणास दिसतील. असा मला विश्वास आहे. असे ते यावेळी म्हणाले.
याबैठकीत जिल्हाधिकारी कार्यालयातून जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सुरवातीला जिल्हयातील कामाकाजाबाबत माहिती केली. तर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षिरसागर, पोलीस अधिक्षक मनोज पाटील, मनपा आयुक्त शंकर गोरे यांनी तर कृषि, समाज कल्याण, आरोग्य, बांधकाम आदी विभागांनी आपआपल्या विभागाची माहिती पालक सचिव श्री. भांगे यांना अवगत करुन दिली.