मुंबई: राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या कारवाईनंतर राष्ट्रवादीला टार्गेट केले जात आहे, असे दिसत आहे. जेव्हा द्वेषबुद्धीचे राजकारण सुरु होते, तेव्हा त्याची फळे कालांतराने भोगावी लागतात, अशी टीका गृहनिर्माण मंत्री ना. जितेंद्र आव्हाड यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आढावा बैठकीनंतर ते माध्यमांशी बोलत होते. अर्थसंकल्पीय अधिवेशनात सर्व मंत्री, आमदारांनी उपस्थित राहायला हवे, पक्षाच्या सर्व सदस्यांचा सक्रीय सहभाग विधिमंडळाच्या कामकाजात असावा, असे निर्देश देण्यासाठी खासदार शरद पवार यांनी बैठक बोलवली होती, अशी माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली.
तसेच युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांबाबतही त्यांनी प्रतिक्रिया दिली. युक्रेनमधील विद्यार्थ्यांना तिथून तत्काळ देशात आणण्याऐवजी भाजपचे मंत्री आता विद्यार्थ्यांनाच दोष देत आहेत. भाजपला माणुसकी, मन, आई-वडिल यांचे दुःख समजत नाही. जेव्हा युद्धाचे ढग जमू लागले तेव्हाच विद्यार्थ्यांना आणण्याचे काम करायला हवे होते. मात्र जेव्हा बॉम्ब पडायला लागले तेव्हा दिवसाला २५० विद्यार्थी आणण्याचा संकल्प केंद्र सरकारने केला. दिवसाला २५० विद्यार्थी आणले तर २० हजार विद्यार्थी आणायला किती दिवस लागतील? याचाही विचार झाला पाहीजे, असे आव्हाड म्हणाले. भारताने याआधी कुवैत, लिबिया युद्धाच्या वेळी काही लाख माणसांना कमी वेळेत मायदेशी परत आणले होते. आज युक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थ्यांना मारहाण होत आहे, केंद्र सरकारची यावर भूमिका स्पष्ट नाही, अशी टीका देखील आव्हाड यांनी केली.