इयत्ता पहिली आणि दुसरीची पुस्तके बदलणार आहे. या पुस्तकांचे यावर्षीचे हे शेवटचे वर्ष आहे. त्यामुळे पुढच्या वर्षापासून पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांना नवीन पुस्तके मिळणार आहे. इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या पाठ्यपुस्तकांमध्ये यंदा कोणताही बदल केला जाणार नाही, अशी माहिती बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील यांनी दिले आहेत. यासंदर्भात परिपत्रक जारी करण्यात आले आहे.
शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ साठी बालवाटीका, बालवाडी, अंगणवाडी तसेच प्रस्तावित नवीन राज्य अभ्यासक्रमावर आधारित शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्याचे प्रस्तावित आहे. शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ (जून २०२४) हे इयत्ता पहिली आणि इयत्ता दुसरी या इयत्तांच्या पाठ्यपुस्तकांचे शेवटचे वर्ष राहील. त्यामुळे इयत्ता पहिली -दुसरीच्या पाठ्यपुस्तकांची खरेदी आवश्यकतेनुसार करण्यात यावी, अशा स्पष्ट सूचना बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील यांनी दिल्या आहेत.
शैक्षणिक वर्ष पासून पथदर्शी स्वरूपात इयत्ता पहिली ते इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू माध्यमांच्या तसेच सेमी इंग्रजीसाठी प्रचलित पाठ्यपुस्तकांमध्ये वह्यांची पाने समाविष्ट असलेली एकात्मिक स्वरूपातील पाठ्यपुस्तके एकूण ४ भागात उपलब्ध करून दिली आहेत. या वर्षीसुध्दा तशाच पद्धतीची पुस्तके उपलब्ध करून दिली जाणार आहेत.
इयत्ता पहिली ते इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य विषयांच्या पाठ्यपुस्तकांची एकूण ४ भागांमध्ये विभागणी करण्यात आलेली आहे. तसेच वैकल्पिक विषयांची पाठ्यपुस्तके स्वतंत्ररित्या उपलब्ध करून दिली जातील, अशी देखील माहिती बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील यांनी दिली आहे