बीड लोकसभा मतदारसंघात आता राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं दिसतंय. भाजप विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार अशी लढत असलेल्या बीडमध्ये आता मनोज जरांगे विरुद्ध पंकजा मुंडे यांच्या वादाची चर्चा सुरू आहे. मी मनोज जरांगे यांच्यावर टीका केली नाही, आणि जर टीका केली तर कधीच शब्द मागे घेत नाही, मी गोपीनाथ मुंडेंची औलाद आहे असं पंकजा मुंडे म्हणाल्या. गरींबांसाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे यांच्यावर आपण टीका केली नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. गेवराई तालुक्यातल्या उमापूर येथे प्रचार सभेत पंकजा मुंडे बोलत होत्या.
भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे म्हणाल्या की, वर्षभरात मी मनोज जरांगे पाटलाचं नाव देखील घेतलं नाही. मला ज्याच्यावर बोलायचं आहे मी त्याच्यावर मोठ्या आवाजात बोलते आणि मी जर टीका केली तर कधीच शब्द मागे घेत नाही, मी गोपीनाथ मुंडेंची औलाद आहे. गरिबांसाठी आंदोलन करणाऱ्या जरांगे पाटलावर मी टीका केली नाही.
काय म्हणाल्या होत्या पंकजा मुंडे?
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर बोलताना भाजप नेत्या पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या की, उपोषण करून कुणाला आरक्षण मिळत नसतं. त्यासाठी विधानसभा, संसदेत कायदा करावा लागतो. त्यासाठी निवडून आलेल्या लोकांना आरक्षणाचा प्रश्न सोडवता येतो. उपोषण केल्याने त्याचा काही फायदा होत नाही.