नगर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील आणि आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांच्यात लढत होत आहे. प्रचारात दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेl. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि महसूलमंत्री राधाकृष्ण विखे हे एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नसल्याचे चित्र आहे. नगर जिल्ह्यातील नेत्यांमध्ये भांडणं लावायचं काम पवारांनी केलं. त्यामुळे जिल्ह्याची प्रगती झाली नाही, असा आरोप विखे पाटलांनी केला आहे. ते शिर्डीत माध्यमांशी बोलत होते.
“शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी त्यांच्या कन्येच्या विजयाची चिंता करावी. त्यांच्या वक्तव्यांना मी फारसं महत्त्व देत नाही. खोटं बोल पण रेटून बोल हाच त्यांचा धंदा आहे, असा घणाघात विखेंनी केला. शरद पवारांच्या राजकारणात सातत्य कुठे आहे? असा सवाल विखेंनी उपस्थित केला आहे. “ते कधी पहाटे शपथविधी करायला सांगतात, कधी भाजपला पाठिंबा देऊन तो काढून घ्यायला सांगतात, काँग्रेसमध्ये असताना विदेशी मुद्द्यावर फारकत घ्यायची आणि ज्यांच्याशी फारकत घेतली त्यांच्याच पायाशी जाऊन बसायचं,”असा टोला विखेंनी पवारांना लगावला. “तुम्हाला तुमच्या सोयीनुसार राजकारण करायची मुभा आहे. त्यामुळेच तुम्हाला स्वकीय सोडून गेले, आता तुम्हाला परीक्षण करण्याची गरज आहे,” असा सल्ला त्यांनी पवारांना दिला.
“पवारांनी नगर जिल्ह्यात जास्त सभा घ्याव्याl हाच आमचा आग्रह आहे, त्यांनी नगर जिल्ह्याचं कसं वाटोळं केलं हे त्यामुळे मला जाहीरपणे बोलता येईल. ते स्वतःला राष्ट्रीय नेते समजतात पण त्यांना अवघे 10 उमेदवार देता आले. काँग्रेसची हीच अवस्था आहे. स्वतःला नेते समजणाऱ्या बाळासाहेब थोरातांना जिल्ह्यात एकही जागा घेता आली नाही. विखेंवर काय टीका करायची करा, तुमचे अपयश तुम्ही मान्य करा,” असा टोला त्यांनी लगावला.