मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आझाद मैदानात शिवसेनेच्या दसरा मेळाव्यातून उद्धव ठाकरे यांच्याबाबत पुन्हा एकदा गौप्यस्फोट केले आहेत. 2019 साली ठाकरेंनी मुख्यमंत्रिपद कसं मिळवलं, याबाबत मुख्यमंत्र्यांनी खळबळजनक दावा केला आहे. शिवसैनिकाला पालखीत बसवणार, पण हे महाशय टुनकन खुर्चीत जाऊन बसले. पवार साहेबांकडे दोन माणसं पाठवली आणि उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करा, अशी शिफारस केली. 2004 पासून तुम्ही प्रयत्न करत होता, पण जुगाड लागत नव्हता. 2019 चे निकाल लागले, तसं सगळे दरवाजे उघडे असल्याचं म्हणाले, असा घणाघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केला.
‘राज ठाकरे आनंद दिघेंबद्दल चांगलं बोलले, मग त्यांचे पंख छाटायला सुरूवात केली. आनंद दिघेंचा अपघात झाला तेव्हा बघायला आला नाहीत, त्यांचा मृत्यू झाला तेव्हा अंत्ययात्रेला आला नाहीत, मग विचारलं आनंद दिघेंची प्रॉपर्टी किती, अरे तो फकीर माणूस आहे,’ असा आरोपही एकनाथ शिंदेंनी केला.
‘रक्ताचं नातं सांगणाऱ्यांनी बाळासाहेबांच्या विचारांचा गळा घोटला आहे. शिवसेना आणि धनुष्यबाण आपल्याला मिळाल्यानंतर यांनी बँकेकडे 50 कोटी मागितले, यांनी निर्लज्जपणे आपल्याला पत्र पाठवलं. तुम्ही आमच्यावर 50 कोटींचे आरोप करता आणि 50 कोटी आमच्याकडे मागता. क्षणाचाही विलंब न लावता 50 कोटी द्यायला लावले, यांचं प्रेम 50 कोटींवर आहे, बाळासाहेबांवर त्यांच्या विचारांवर नाही, अशी टीकाही मुख्यमंत्र्यांनी केली.
‘सारखं मर्द मर्द का म्हणावं लागतं? ही सभा मर्दांची आहे, तिथली सभा हुजरे आणि कारकुनांची आहे, तिकडे आहेत त्यांनी इकडे या, कारकुनांसोबत काम करायचं, का जनतेची कामं करतायत, त्यांच्यासोबत यायचं हे ठरवा,’ असं म्हणत एकनाथ शिंदेंनी ठाकरेंसोबत असलेल्यांना त्यांच्यासोबत यायचं आवाहनही केलं.