मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत चंद्रकांत पाटलांच्या दाव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. चंद्रकांत पाटील यांच्या देवेंद्र फडणवीसांच्या अटकेबाबतच्या दाव्यावर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मला त्याबाबत अशी माहिती आहे की, महाविकास आघाडीच्या काळात केवळ देवेंद्र फडणवीसच नव्हे तर भाजपा नेते गिरीश महाजन, आशिष शेलार आणि प्रवीण दरेकर यांना अटक करण्याच्या हालचाली झाल्या होत्या. मविआ सरकारने काही खटले दाखल करून या लोकांना अटक केली असती. तसेच २०२४ च्या निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पार्टीचे आमदार फोडण्याचाही कट त्यांनी (मविआने) रचला होता.
यावेळी शिंदे यांना प्रश्न विचारण्यात आला की, उद्धव ठाकरे आणि तुमच्यात कोणत्या मुद्द्यावरून ठिणगी पडली? त्यावर शिंदे म्हणाले, मला वर्षा बंगल्यावर बोलावलं गेलं आणि तास वाट पाहायला लावली. हे नेहमीच व्हायचं. दोन वर्षे हे सातत्याने होत होतं. अखेर, राज्यसभा निवडणुकीवेळी मला चर्चेपासून दूर ठेवण्यात आलं. माझ्याकडून नगरविकास खातंदेखील काढून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मला नक्षलवाद्यांकडून धमक्या आल्यानंतरही मला झेड प्लस सुरक्षा दिली गेली नाही. अशा अनेक गोष्टी घडत होत्या.