लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र काँग्रेसला एक मोठा धक्का बसला आहे. महाविकास आघाडीमध्ये काही जागांवरून नाराजीनाट्य रंगल्यानंतर काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसफूस मोठ्या प्रमाणावर आहे. त्यातच उत्तर मध्य मुंबईसाठी वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काँग्रेसचे नेते, माजी मंत्री नसीम खान यांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांना पत्र लिहून आपण स्टार प्रचारक पदाचा आणि प्रचार समितीच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे नसीम खान यांनी सांगितले. काँग्रेसने राज्यात एकही मुस्लीम उमेदवार दिला नाही, याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
“काँग्रेसला मुस्लीमांची मते तर हवी असतात, पण त्यांना उमेदवारी का नाही?”, असा प्रश्न उपस्थित करून नसीम खान यांनी आपली नाराजी उघड केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उत्तर मध्य मुंबईतून तिकीट मिळविण्यासाठी नसीम खान प्रयत्नशील होते, मात्र याठिकाणी वर्षा गायकवाड यांना उमेदवारी मिळाल्यामुळे ते नाराज झाले.
नसीम खान यांनी खरगेंना लिहिलेल्या पत्रात म्हटले की, ते लोकसभा मतदानाचे जे टप्पे उरले आहेत, त्याच्या प्रचारात सहभागी होणार नाहीत. यासाठी नसीम खान यांनी दोन कारणे दिली आहेत. पहिले म्हणजे, महाविकास आघाडीने महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघापैकी एकाही मतदारसंघात मुस्लीम उमेदवार दिलेला नाही. दुसरे कारण म्हणजे, राज्यातील अनेक मुस्लीम संघटना, नेते आणि पक्षातील कार्यकर्ते यांना अपेक्षा होती की, काँग्रेस पक्ष तरी निदान एखाद्या मुस्लीम नेत्याला उमेदवारी देईल. पण दुर्दैवाने काँग्रेसनेही उमेदवारी दिलेली नाही.