अहमदनगर येथे आयोजित ओबीसी एल्गार मेळाव्यात बोलताना छगन भुजबळ म्हणाले, मी अडीच महिन्यांपूर्वीच मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. आंबड येथे १७ नोव्हेंबर रोजी ओबीसी एल्गारची पहिली रॅली झाली. त्या रॅलीच्या एक दिवस आधी, म्हणजेच १६ नोव्हेंबर रोजी मी माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मी आधी राजीनामा दिला आणि मगच आंबडच्या सभेसाठी रवाना झालो. त्यामुळे मला लाथा घालायची गरज नाही.
दरम्यान, भुजबळ यांनी राजीनामा राज्यपालांकडे का दिला नाही? त्यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी का स्वीकारला नाही? राजीनाम्यानंतर कॅबिनेटमध्ये काय घडलं? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या प्रश्नांना छगन भुजबळ यांनी उत्तर दिलं आहे. मंत्री छगन भुजबळ म्हणाले, मी १७ नोव्हेंबर रोजी आंबडच्या ओबीसी एल्गार सभेला जाण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांच्या नावाने माझा राजीनामा लिहून तो अजित पवारांच्या कार्यालयाला पाठवून दिला होता. सभेला जाताना या राजीनाम्याची कुठेही वाच्यता करू नका असा निरोप मला पाठवण्यात आला. त्यामुळे मी सभेत राजीनाम्याची वाच्यता केली नाही. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी (अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस) मला बोलावून घेतलं. त्यावेळी अजित पवार मला म्हणाले, मी तुमचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे दिला आहे.
छगन भुजबळ म्हणाले, तिन्ही नेते मला म्हणाले की, तुमचं काम आणि ओबीसींबाबत मत मांडायला आमचा विरोध नाही. आपण शांततेत ओबीसींचं काम करायला पाहिजे. राजीनाम्याची वाच्यता करू नका. त्यानंतर अडीच महिने मी राजीनाम्याची वाच्यता केली नाही. त्यानंतर एक जण बोलला की, भुजबळच्या कमरेत लाथ घाला आणि त्याला मंत्रिमंडळाबाहेर बाहेर काढा. त्या वक्तव्यानंतर मी राजीनाम्याची वाच्यता केली.