बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी सांगितलं की लोकसभा निवडणुकीसाठी मी लवकरच उमेदवार जाहीर करणार आहे. त्यावेळी काही लोक येतील भावनिक साद घालतील, ही शेवटची निवडणूक आहे सांगतील. पण तुम्ही मात्र अजित पवार उभा आहे हे समजून मतदान करा. शेवटची निवडणूक सांगतील, कधी शेवटची निवडणूक असेल काय माहीत. असं वक्तव्य केलं होतं. अजित पवारांनी नाव न घेता ही टीका शरद पवार यांच्यावर केली होती. त्यानंतर आता या वक्तव्याचे पडसाद उमटू लागले आहेत. मला अजित पवारांबरोबर काम केल्याची लाज वाटते असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
आज अजित पवारांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत असताना हद्द ओलांडली आहे. एखाद्या माणसाच्या मृत्यूची प्रार्थना करणं, याचना करणं हे माणुसकीला शोभणारं आहे काय याचा विचार अजित पवार यांनी जरुर करावा असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांवर टीका केली.
आपल्या काकाच्या मृ्त्यूची वाट बघतोय, हे राजकारण आहे का अजित पवार? भावनिक आवाहन करतील, ही शेवटची निवडणूक असेल. काय माहीत शेवटची निवडणूक कधी असेल? शरद पवार आहेत ते अजरामर राहतील, त्यांचं योगदान अजरामर असणार आहे हे विसरु नका. आज अजित पवारांनी सगळी हद्दच ओलांडली. असं म्हणत आव्हाडांनी त्यांना उत्तर दिलं आहे.
जितेंद्र आव्हाड म्हणाले, “आपली उंची ओळखा कुठे शरद पवार आणि कुठे तुम्ही? अटल बिहारी वाजपेयी, मनमोहन सिंग हे देखील नावं काढतात. लाज वाटते मला तुमच्या सोबत काम केल्याची आधी पण वाटतच होती. शरद पवार देशाचे नेते तुम्हाला महाराष्ट्रात कोण ओळखत नाही. ज्या कुटुंबाने तुम्हाला सर्व दिले, ज्या माऊलीने तुम्हाला सर्व दिले तीच कुंकू कधी पुसलं जाईल याची आज तुम्ही वाट बघता असल घाणेरडं राजकारण महाराष्ट्राने कधी बघितलं नाही.”