शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन पक्ष फुटले. यामागचं कारण काय? ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत सांगितलं आहे.दोन पक्ष विभाजित झालेले दिसतात याचं एकमेव कारण आहे ते म्हणजे अहंकार आणि अतिमहत्वकांक्षा”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
उद्धव ठाकरेंना अहंकार होताच. ते आमच्याबरोबर होते तेव्हाही रोज मोदींवर शेलक्या शब्दांत बोलायचं, लिहायचं हे त्यांनी केलं. कारण तो त्यांचा अहंकार होता. तसंच मुख्यमंत्रिपदाची लालसा होती. खरंच शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवायचं असतं तर एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करु शकत होते. शिवसैनिकांना मुख्यमंत्री करायचं नव्हतं, उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं होतं. संधी मिळाली तशी त्यांनी विचारांन तिलांजली दिली. बाळासाहेब ठाकरेंचे विचार बासनात गुंडाळले आणि सरकार स्थापन केलं. हीच त्यांची अति महत्वकांक्षा पक्ष विभाजित होण्यासाठी कारणीभूत ठरली. कारण माझ्यानंतर माझा मुलगा अशा प्रकारचा विचार त्यांच्या मनात आला. मुलासाठी अडसर कोण कारण एकनाथ शिंदे. एकनाथ शिंदे आमदारांमध्ये प्रसिद्ध होते. त्यामुळे त्यांचे पंख छाटण्यास सुरुवात झाली. त्यांच्या मंत्रालयात त्यांना न बोलवता आदित्य ठाकरे बैठका घेऊ लागले होते. त्यांच्याबरोबरच्या आमदारांना धमक्या देण्यात आल्या. अशा परिस्थितीत एकनाथ शिंदेंना हे समजलं की विचारांशी प्रतारणा झाली, दुसरीकडे आपल्याला संपवण्याचा प्रयत्न होतो त्यामुळे शिवसेनेचं विभाजन झालं.”
शरद पवार यांनी तीनवेळा आमच्याशी चर्चा केली. त्यावेळी अजित पवार यांना पुढे केलं. आमच्याशी युती त्यांनी करण्याच्याच त्या चर्चा होत्या. निर्णय झाला होता तरीही मागे हटले. अजित पवारांना शरद पवारांनी व्हिलन ठरवलं. कारण त्यांना पक्ष सुप्रिया सुळेंच्या हातात द्यायचा होता. अजित पवार लोकांमध्ये प्रसिद्ध होते, पण अडसर ठरत होते. महाराष्ट्राची माहिती अजित पवारांना जास्त आहे. अजित पवारांना व्हिलन करत नाही तोपर्यंत सुप्रिया सुळेंना हिरो करता येणार नाही असं राजकारण शरद पवारांनी केलं. त्यामुळे अजित पवार आमच्या बरोबर आले. महाराष्ट्रातल्या जनतेने हा इतिहास पाहिला आहे. यामुळेच या दोन पक्षांचं विभाजन झालं.” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.