अहमदनगर : भावांसोबत निंबळक येथील पाझर तलावात पोहायला गेलेल्या नवनागापूर येथील तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. गौरव रवींद्र दिवाण (वय ३६, रा. नवनागापूर, ता.नगर) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.मयत गौरव यांचे दोन भाऊ नुकतेच दिल्लीहून नगरला आले होते. घरातील पूजेचे साहित्य तलावात विसर्जन करण्यासाठी हे तिघे निंबळक परिसरातील पाझर तलावात गेले. त्यानी पूजेचे साहित्य तलावात विसर्जित केले.
त्यानंतर हे तिघे पोहण्यासाठी तलावात उतरले. गौरव एका बाजूला, तर त्याचे दोन भाऊ दुसऱ्या बाजूने पोहत होते. गौरव यालाही पोहता येत होते. परंतु, तो अचानक दिसेनासा झाला. दोन्ही भावांनी त्याचा शोध घेतला. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिस ठाण्याचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शोध घेतला असता गौरव मृतावस्थेत मिळून आला. त्याचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला आहे, अशी माहिती एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक माणिक चौधरी यांनी दिली.