लोकसभा निवडणुकीच्या धुमाळीत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सामंजस्याची भूमिका घेतली. पण काल रात्री बीडमधील आष्टीजवळील एका सभेत त्यांनी केलेल्या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.अंबोरा येथील सभेत मनोज जरांगे पाटील यांनी अनेक मुद्यांना हात घातला. मराठा ताकतीने एकत्र आला आहे. देशाने धास्ती घेतली आहे. एकीची भीती एवढी बसली आहे की चांगल्या चांगल्याने गुडघे टेकावे लागत आहे.मराठा एक झाला म्हणून राज्यात पाच टक्क्यात निवडणूक लागली. दुसरीकडे एक आणि.दोन टप्प्यात निवडणुका होत आहे. हाच मराठ्यांचा विजय आहे, असे ते म्हणाले.
या सभेत जरांगेंच्या एका विधानाने अनेकांच्या मनात धडकी भरवली. या निवडणुकीत असे पाडा की पाच पिढ्या घरी बसले पाहिजे. माझ्या गोरगरीब मराठ्यांना त्रास दिला तर पुढच्या दहा पिढ्या मराठे तुमच्या कपाळाला गुलाल लावणार नाहीत दुसऱ्यासाठी मराठा समाजाच्या विरोधात जाऊ नका, ही शेवटची संधी आहे तुम्हाला, असा इशारा त्यांनी दिला. जात महत्वाची आहे, तो आपल्यासोबत आला नाही तर त्याला जिल्हा परिषद ,सरपंच पदाला पाडा. मराठ्यांच्या विरोधात जाऊ नका, परिणाम भोगावे लागतील. मोदी इथे मुक्कामी आहे. मराठा कुणबी कायदा पारित नाही केला तर विधानसभेला बघतो, असा इशारा पण त्यांनी सत्ताधाऱ्यांना दिला.