सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीत तिढा निर्माण झाला आहे. यावरून शिवसेनेच्या शिंदे गटाने महाविकास आघाडीवर टीका केली आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते आणि आमदार संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सांगलीच्या जागेवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्षात भांडण लावलं आहे. ही शरद पवारांची खेळी असून ठाकरे गट त्या खेळीत अडकला आहे.
संजय शिरसाट म्हणाले, ज्या सांगलीत शिवसेना उबाठा पक्षाचं अस्तित्व नाही, जी जागा ते कधी लढले नाहीत त्या जागेवर उबाठा गट आणि काँग्रेसमध्ये तिढा कसा काय निर्माण होईल. मुळात हा तिढा निर्माण व्हावा म्हणून ही ठरवून केलेली खेळी आहे. उबाठा गटाचं सांगलीवर कसलंही प्रेम नाही. ज्याला त्यांनी सांगलीतून उमेदवारी दिली आहे तो डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील काही उबाठा गटाचा कार्यकर्ता नाही. ज्याच्यासाठी उबाठा गट आग्रही भूमिका मांडतोय तो चंद्रहार पाटील शिवसैनिकही नाही. खरंतर ही शरद पवारांनी खेळलेली खेळी आहे. त्या खेळीत उबाठा गट फसला आहे. उबाठा गट आणि काँग्रेसनं भांडायचं आणि शरद पवार दुरून मजा बघणार.