मुंबईः राज्यातील ऊस गाळपाचा प्रश्न, वीजेचा प्रश्न, मराठा आणि ओबीसी आरक्षण प्रश्न सुटलेले नाहीत, तसेच राज्यातील भ्रष्टाचार चरम सीमेला पोहोचलाय, हे भ्रष्टाचारी सरकार आहे, असे आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केले. तसेच महाविकास आघाडी सरकारच्या वाईन धोरणावर टीका करताना, सरकारनं हा निर्णय शेतकरी बारा बलुतेदारांसाठी घेतला नाही तर बेवड्यांसाठी घेतला आहे. हे बेवड्यांना समर्पित सरकार आहे, असा ठपका देवेंद्र फडणवीस यांनी ठेवला.
महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, हे आतापर्यंतचं सर्वाधिक भ्रष्टाचारी सरकार आहे. कारकून साहेबाला लाच मागतोय, तुम्हाला 15 लाख मिळाले, मला 2 लाख का नाही? असा सगळा पर्कार आहे. बंदुकीचा धाक दाखवल्याचेही प्रकार झाले आहेत. एकूणच सरकार पूर्णपणे फेल झालं, या सरकारला एकच घटक जवळचा वाटतो, तो म्हणजेच दारु उत्पादन करणारा, बेवड्यांना समर्पित हे सरकार आहे, बेवड्यांसाठी जेवढे निर्णय घेतले, तेवढे शेतकरी बारा बलुतेदारांसाठी घेतलेले नाही. त्यामुळे सरकारचे काळे कामं बाहेर काढू, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला.
नवाब मलिकांचा राजीनामा न घेऊन एका विशिष्ट समाजाला सिग्नल देण्याचा सरकारचा प्रयत्न सुरु आहे. संजय राठोडचा राजीनामा पटकन होतो, पण नवाब मलिकांनी देशद्रोह्यांसोबत व्यवहार केल्यानंतरही वाचवण्याचा प्रयत्न हा अतिशय दुर्दैवी आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली. सरकार नवाब मलिकांचा राजीनामा घेणार नसेल तर हे देशद्रोह्यांसाठी समर्पित सरकार आहे, असेच म्हणावे लागेल, अशी टीका फडणवीस यांनी केली.