मनोज जरांगे पाटील यांच्यावर आरोप करणं अजय महाराज बारस्कर यांना चांगलंच भोवलं आहे. अजय महाराज बारस्कर यांनी जरांगे यांच्यावर टीका केल्यामुळे त्यांना प्रहार जनशक्ती पक्षातून निलंबित करण्यात आले आहेत. पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी ही कारवाई केली आहे. बारस्कर यांनी पक्षविरोधी भूमिका घेतली आहे. पक्षाचा जरांगे यांना पाठिंबा असताना वेगळी भूमिका घेतल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात येत असल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. तसेच बारस्कर यांच्या विधानाशी पक्ष सहमत नाही, पक्षाची ती अधिकृत भूमिका नसल्याचंही बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्याध्यक्ष बल्लू ऊर्फ महेंद्र जवंजाळ यांनी एक निवेदन काढून ही माहिती दिली आहे. अजय महाराज बारस्कर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत जी भूमिका मांडली त्याचं प्रहार जनशक्ती पक्ष समर्थन करत नाही. किंवा प्रहार वारकरी संघटनाही समर्थन करत नाही. किंवा आमचा या विधानाशी काहीच संबंध नाही. अजय महाराज बारस्कर यांना प्रहार जनशक्ती पार्टी आणि प्रहार वारकरी संघटनेमधून बडतर्फ करण्यात येत आहे. त्यांचा पक्षाशी आजपासून काहीच संबंध राहणार नाही, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, नेते आणि कार्यकर्त्यांसाठी बच्चू कडू यांनी नवा आदेशही दिला आहे. पक्षातील कोणत्याही व्यक्तीने मनोज जरांगे पाटील, मराठा नेते आणि मराठा आरक्षणावर भाष्य करू नये. भूमिका मांडू नये. तसं केल्यास त्या व्यक्तीला पक्षातून काढलं जाईल. त्याचा पक्षाशी काहीच संबंध राहणार नाही, अशी तंबीच बच्चू कडू यांनी दिली आहे. तसेच या पुढे मनोज जरांगे, मराठा आरक्षण आणि मराठा नेत्यांबाबत केवळ बच्चू कडूच भूमिका मांडतील, असंही या पक्षादेशात म्हटलं आहे.