मुख्यमंत्र्यांना चक्रव्यूहातअडकवले असून त्यांचा अभिमन्यू झालाय, असा गंभीर आरोप माजी मंत्री शिंदे गटाचे सुरेश नवले यांनी भाजपावर केला आहे. भाजपाच्या भट्टीत शिवसैनिकांचे बळी जात आहेत. असं म्हणत सुरेश नवले यांनी मुख्यमंत्र्यांनाच घरचा आहेर दिलाय. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत सुरेश नवले यांनी वक्तव्य केले आहे.
नवले म्हणाले, भाजपाने कृपाल तुमाने ,हेमंत पाटील ,भावना गवळी यांचा बळी दिला आहे. भाजपाच्या भट्टीत शिवसैनिकांचे बळी जात आहेत.. हे महाराष्ट्रातल्या शिवसेनेसाठी शोभादायक नाही. शिवसैनिकाला न्याय मिळत नाही म्हणून हा उठाव झाला. सगळे मुख्यमंत्र्यांच्या सोबत बाहेर पडले आणि सरकार अस्तित्वात आलं. ज्या कारणासाठी उद्धव ठाकरेंना शिवसैनिकांनी सोडलं, ठाकरेंचं नेतृत्व झुगारलं . त्याच कारणासाठी शिवसैनिकांचा आता राग आहे . सामान्य शिवसैनिक सोडा विद्यमान खासदारांना आपली खासदारकी मिळवता आली नाही हे दुर्दैव आहे .
भारतीय जनता पार्टी शिवसेना पक्ष संपवते आहे. आयबीचा रिपोर्ट सर्व्हे निगेटिव्ह आहे म्हणत उमेदवारी नाकारत आहेत. सर्वस्व पणाला लावून जे मुख्यमंत्र्यांसोबत आले त्यांच्या वाट्याला राजकीय जोहार आलाय. जागा बदलण्यासाठी मुख्यमंत्र्यावर दबाव कुणी टाकला. भारतीय जनता पार्टीच्या दबावाला मुख्यमंत्री बळी पडले. मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीच्या दबावाला एकाकी तोंड देत आहेत ते कमी पडत आहेत.सामूहिक दबाव आणून जागा सोडून घेतल्या जात आहेत, असे देखील सुरेश नवले म्हणाले.
शिवसेना पक्ष चालवण्याचे दिग्दर्शन भाजपा करते आहे. हा सिनेमा लोकसभेत चालेल का याचे उत्तर जनता देईल. चाळीस आमदारांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. ते विचार करतात ते 13 खासदारांना तिकिटासाठी हा घाम फुटला,तर उद्या आमचं तिकीट मिळवण्यासाठी किती घाम फुटेल…किती पराकाष्टा करावी लागेल…त्यात तिकिट मिळेल याची शंका आहे आमदारांच्या मनात साशंकता. भारतीय जनता पार्टीचे हे धोरण पहिले मित्र संपवू नंतर शत्रूकडे पाहू, असेही सुरेश नवले म्हणाले.