गेल्या वर्षाच्या मध्यानंतर राज्यात पुन्हा ओबीसीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा समाज एकवटला. काही मागण्या मान्य झाल्या तर सरकारच्या काही निर्णयावर मराठा समाज नाराज आहे. मराठा समाज येत्या लोकसभा निवडणुकीत ही नाराजी व्यक्त करण्याची दाट शक्यता आहे. अनेक लोकसभा मतदारसंघातून जास्तीत जास्त उमेदवार देऊन राजकीय पक्षांना जेरीस आणण्याची मराठा समाजाची खेळी आहे. उमेदवार अधिक असल्यास मतदान प्रक्रिया कशी पार पाडावी, याविषयीचे मार्गदर्शन धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांनी यापूर्वीच मागितले होते. आता प्रकरणात प्रशासनाने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे.
धाराशिव लोकसभेत 400 पेक्षा जास्त उमेदवारी अर्ज आल्यास काय करावे यासाठी जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी जिल्हा स्तरीय विशेष अभ्यास समिती गठीत केली आहे. या समितीत 15 सदस्य आणि अधिकाऱ्यांचा समावेश आहे. महसूल आणि जिल्हा परिषदेतील कार्यरत आणि सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांना पण या कामासाठी जुंपले आहे. मराठा समाजाने प्रत्येक गावातुन उमेदवारी अर्ज भरण्याची तयारी केल्याने प्रशासन अलर्ट मोडवर असल्याचे दिसून येते.