पंतप्रधान मोदी यांच्या प्रयत्नांमुळेच करोनावरील लस उपलब्ध झाली आणि देशातील जनतेचे प्राण वाचले, त्यामुळे या निवडणुकीत भाजपाच्या उमेदवारांना मत देऊन मोदींना विजयी करा, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. यावरूनच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी फडणवीसांना टोला लगावला आहे. या अर्थानेच मग काँग्रेसच्या काळात पोलिओची लस तयार झाली होती. त्यामुळे फडणवीसांनी आता काँग्रेसला मत द्यावे, असे ते म्हणाले. ते पुण्यातील एका प्रचारसभेत बोलत होते.
“एका प्रचारसभेत बोलताना, पंतप्रधान मोदी यांच्या प्रयत्नांमुळेच करोनावरील लस उपलब्ध झाली, त्यामुळे मोदींना मत द्या, असे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. मग याच अर्थाने काही वर्षांपूर्वी काँग्रेसच्या काळात पोलिओची लस तयार झाली होती. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी आता काँग्रेसला आणि महाविकास आघाडीला मत द्यावे”, असा टोला जयंत पाटील यांनी फडणवीसांना लगावला आहे.