रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची शुक्रवारी येथे जाहीर सभा झाली. उद्धव ठाकरेंना लक्ष्य करताना शहा म्हणाले की, ठाकरेंनी सत्ता मिळवण्यासाठी काँग्रेस आणि पवारांपुढे शरणागती पत्करली आहे. अशी व्यक्ती महाराष्ट्राचा स्वाभिमान राखू शकत नाही. तिहेरी तलाक, समान नागरी कायदा, मुस्लिम व्यक्तिगत कायदा इत्यादी मुद्दयांवर ते भूमिका घेऊ शकत नाहीत. आत्तापर्यंत काँग्रेसकडे असलेली मुस्लिम मतपेढी आपल्याकडे वळवण्यासाठी त्यांनी ही तडजोड केली आहे. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांच्या पोटी त्यांनी जन्म घेतला असला तरी बाळासाहेबांचा वारसा एकनाथ शिंदे, राज ठाकरे आणि नारायण राणे चालवत आहेत.लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रात विरोधक सत्तेवर आले तर अस्थिर सरकार स्थापन होईल, असा इशारा देऊन, जगातील तिसरी आर्थिक सत्ता बनण्याचे, विकसित भारताचे स्वप्न पाहणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा विजयी करा, असे आवाहन शहा यांनी केले.