Sunday, May 19, 2024

विखेंकडे संपत्ती आणि सत्ता, लंकेंकडे मायबाप जनता ! डॉ. अमोल कोल्हे यांची विखे यांच्यावर टीका

नगर : प्रतिनिधी विखे यांच्याकडे एक मुख्यमंत्री, दोन-दोन उपमुख्यमंत्री, दोनशे आमदार आहेत, आफाट पैसा आहे, पाच-पाच पिढयांचे राजकारण आहे, यंत्रणा आहे, राज्यातली सत्ता, केंद्रातली सत्ताही आहे. तर दुसरीकडे नीलेश लंके यांच्याकडे काय आहे तर लंके यांच्याकडे त्यांची मायबाप जनता आहे. याच जनतेची ही निवडणूक असून लंके यांनी अर्ज दाखल केला त्याच दिवशी त्यांचा विजय निश्‍चित झाल्याचे खा. डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले.
महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांच्या प्रचारार्थ नगर शहरातील माळीवाडा येथे आयोजित करण्यात आलेल्या जाहिर सभेत डॉ अमोल कोल्हे यांनी तडाखेबंद भाषण करीत विरोधी उमेदवार डॉ. सुजय विखे यांच्यासह भाजपावर सडकून टीका केली.
यावेळी बोलताना डॉ. कोल्हे म्हणाले, आमच्याकडे एक मुख्यमंत्री चार वेळा येऊन गेले. एक उपमुख्यमंत्री पाच वेळा येऊन गेले, उद्याही परत येत आहेत. दुसरे परवा मोकळे होतील,त्यानंतर ते माझ्या मतदारसंघातच असतील. नगरमध्येही सहा, सात आठ काहीतरी मोठ मोठया सभा लागल्यात म्हणतात. लंके आणि मी दोघेही सामान्य तरीही आमच्या उमेदवारीचा इतका धसका का असा प्रश्‍न उपस्थित करीत सर्वसामान्य जनतेने ही निवडणूक हाती घेतली असून वरून कोणीही प्रचारासाठी येउ द्या, कीतीही हेलीकॉप्टर उडू द्या, कितीही लँड होऊ द्या, लंके यांचे दिल्लीचे फ्लाईट पक्के असल्याचा दावा डॉ. कोल्हे यांनी केला.

मोदी सरकारने सैन्यात अग्निवीरची योजना आणली. सहा महिन्याच्या प्रशिक्षणानंतर तरूण सैन्यात भरती होतो. देशांच्या सिमांचे रक्षण करण्यासाठी सैन्यात भरती होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरूणांपुढे मोदी सरकारने काय पर्याय ठेवला ? सहा महिन्यांचे प्रशिक्षण, चार वर्षांची नोकरी करा. आठराव्या वर्षी कंत्राटी पध्दतीने सैन्यात भरती होऊन बाविसाव्या वर्षी बाहेर पडेल. बाविसाव्या वर्षी काय असेल त्या तरूणाच्या भविष्यात ? दरवर्षी दोन करोड नोकऱ्यांचे आश्‍वासन दिले होते. त्याचे काय झाले ? असे प्रश्‍न डॉ. कोल्हे यांनी यावेळी उपस्थित केले.

पुणे-नगर रेल्वेचा प्रश्‍न विक्रम राठोड यांनी उपस्थित केला तो धागा पकडून डॉ कोल्हे म्हणाले, काळजी करू नका. तुमचे निम्मे काम मी केलेय. गेल्या २५ ते ३० वर्षांपासून पुणे-नगर महामार्गाच्या वाहतूकीचा जो प्रश्‍न होता शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मी मार्गी लावला आहे. पुण्याच्या फिनिक्स मॉलपासून १८ लेनचा फलाय ओहर होणार आहे. शिरूरवरून पुण्याला दुसऱ्या मजल्यावरून थेट पोहचता येईल. नगर-पुणे दरम्यान प्रवास असेल तर पहिल्या मजल्यावरून जाता येईल. साडेनऊ हजार कोटी रूपयांचा हा प्रकल्प असून त्याची निविदा प्रक्रिया सुरू होणार असल्याने नगर-पुण्याचा प्रवास सुकर होईल असा विश्‍वास डॉ. कोल्हे यांनी व्यक्त केला.

डॉ. विखे म्हणाले, डॉ. अमोल कोल्हे संसदेत आणि नगरमध्येही घोडयावर दिसले. नगरमध्ये जेंव्हा घोडयाच्या टापा पहिल्यांदा इथे उधळल्या त्यावेळी स्व. अनिल भैय्या राठोड यांनी पहिला महानाटयाचा प्रयोग घेतला होता. स्वतः सुजय विखे हे राजकारणात येत होते,त्यावेळी शिर्डीमध्ये तोच घोडा दौडून आला होता. संगमनेरमध्ये आणि त्यानंतर नगरमध्ये तोच घोडा दौडून आला. घोडा या प्राण्यावर त्यांचे फारच प्रेम असेल नीलेश लंके खासदार झाल्यावर नगरमध्ये पुन्हा महानाटयाचा प्रयोग करू. असे सांगत डॉ. कोल्हे यांनी डॉ. विखे यांना टोला लगावला.

दक्षिण नगर मतदारसंघाचा विचार केला तर जेंव्हाही मोठे पाहुणे येतात, मोठे नेते येतात, ते शिर्डी लोकसभा मतदारसंघात जातात. दक्षिण नगरने मते द्यायची आणि पंतप्रधान, गृहमंत्री आले की ते शिर्डीमध्ये न्यायचे. २०२९मध्ये लोकसभा मतदारसंघांची फेररचना होणार असल्याने त्या मतदारसंघाची विखे हे आतापासूनच तजविज करीत आहेत. ते अशी तजविज करीत असतील तर दक्षिण नगरची माणसं साधी आहेत का ? उत्तरेचे पार्सल उत्तरेला पाठविल्याशिवाय ते शांत बसणार नाहीत असा विश्‍वास डॉ. कोल्हे यांनी व्यक्त केला.

सुजय विखे यांनी पाच वर्षात काय केले ? दुसऱ्याने मंजुर करून आणलेल्या कामांचे त्यांनी भुमिपुजने केली. त्यांच्या कामांचे मुल्यमापन मतदारांनी केले पाहिजे. त्यांचे इंग्रजी चांगले आहे मग सभागृहातील इंग्रजीतील त्यांचे एखादे भाषण आहे का ? काही प्रश्‍न मांडले का ? तुम्ही मतदार संघात नव्हते आणि सभागृहातही नव्हते, मग होते कुठे हाच खरा प्रश्‍न आहे. मजा करण्यासाठी आणि खासदारकी दाखविण्यासाठीच त्यांना हे पद हवे आहे.

बाळासाहेब थोरात
माजी मंत्री

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles