१० मे रोजी अहमदनगरात निर्भय बनो सभा; डॉ. विश्वंभर चौधरी ॲड. असीम सरोदे प्रमुख वक्ते तर ॲड. निशा शिवूरकर अध्यक्ष
अहमदनगर (प्रतिनिधी)
प्रत्येक नागरिकाने जागे होणे गरजेचे आहे कारण धोक्याची घंटा वाजली आहे, नागरिकांनी सत्य ऐकायला शुक्रवारी ता. १० मे २०२४ रोजी डॉ. विश्वंभर चौधरी आणि ॲड. असीम सरोदे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या निर्भय बनो सभेत यावे.
देशातील लोकशाही ही अधिक प्रबळ व्हावी व देशात संविधानाप्रमाणे सुशासन असावे या उद्देशाने जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्रातील विविध ठिकाणी सामाजिक काम करणाऱ्या लोकांनी एकत्रित येत निर्भय बनो चळवळ सुरू केलेली आहे. सध्या देशातील एकंदरीत वातावरण हे लोकशाहीकरीता मारक असून संविधानाची पायमल्ली होत आहे. अलिखित आणीबाणी आणि हुकुमशाही सदृश्य परिस्थिती आहे, सरकारच्या विरुद्ध जनहीतार्थ आवाज उठविणाऱ्यांचा आवाज दाबला जात आहे, तसेच धर्म आणि जातीच्या आधारे देशात द्वेषपूर्ण वातावरण पसरविण्यात येत आहे. राजकारणाचे गुन्हेगारीकरण झाले आहे, प्रसिद्धीमाध्यमे विशेषतः इलेक्ट्रॉनिक मिडीया ही एकांगी सत्ताधारींच्या बाजूने वार्तांकन करत असल्याने तसेच काही राज्यकर्ते सत्तेचा आणि सोशल मिडीयाचा दुरुपयोग करत जनतेपर्यंत सत्य आणि खरी परीस्थिती पोहचू देत नसल्याने जनतेची दिशाभूल होत आहे. मणिपुर, लडाख, नागालँड मधील शांतता भंग झाली आहे, कृषी मालाला योग्य भाव नसल्याने व उत्पन्न खर्च वाढल्याने शेतकरी अधिक कर्जबाजारी होत आहेत आणि आत्महत्या करत आहेत, बेरोजगारीमुळे तरुणवर्ग पिचत आहे, महिला अत्याचारावर सरकार मौन आहे तर महागाईचा आगडोंब उसळलेला आहे. भ्रष्टाचार, फोडाफोडीचे राजकारण आणि राजकारणातील संधिसाधूपणामुळे नागरिकांनाच्या मुलभूत हक्क अधिकारांची पायमल्ली होत असून नागरिकांचे मूलभूत प्रश्न हे हरवलेले आहेत.
प्रत्येक नागरिकाने जागे होणे गरजेचे आहे कारण धोक्याची घंटा वाजली आहे. संविधानाची प्रतिष्ठा वाढेल अशा लोकशाहीसाठी आपले योगदान देण्याची हिच खरी वेळ आहे. याबाबत जनजागृती करण्याकरिता या चळवळीच्या महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात आतापर्यंत ५५ पेक्षा अधिक सभा झालेल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर आपल्या जिल्ह्यात जनजागृती करिता आम्ही येत्या १० मे २०२४ रोजी सायंकाळी सहा वाजता माऊली सभागृह, तलाठी संकुल, झोपडी कँटीन, मनमाड रोड, सावेडी, अहमदनगर येथे नागरिकांशी संवाद कार्यक्रमाचे आयोजन जिल्ह्यातील विविध सामाजिक संस्था यांनी एकत्रित येवून केलेले आहे. यामध्ये डॉ. विश्वंभर चौधरी आणि ॲड. असीम सरोदे हे प्रमुख वक्ते असणार आहेत तर ॲड. निशा शिवूरकर या कार्यक्रमाच्या अध्यक्ष असणार आहे.
तरी संविधान आणि लोकशाहीप्रेमी नागरिकांनी या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थितीत राहावे, अशी विनंती संयोजकांच्या वतीने संध्या मेढे, युनूसभाई तांबटकर, ॲड. श्याम आसावा, ॲड. संतोष गायकवाड, अशोक सब्बन, आनंद शितोळे, फिरोज शेख, भैरवनाथ वाकळे आदींनी केली आहे.
नगरमध्ये १० मे रोजी निर्भय बनो सभा… विश्वंभर चौधरी, असीम सरोदे बोलणार…
- Advertisement -