नगर लोकसभा मतदारसंघ निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार माजी आमदार निलेश लंके यांना स्वाभिमान जन संवाद यात्रेत आलेले अनुभव त्यांनी सोशल मीडियावर मांडले आहेत. टाकळी ढोकेश्वर येथे मिळालेल्या प्रतिसादामुळे लंके यांनी आनंद व्यक्त केला आहे. लंके यांनी म्हटले आहे की,
नगर दक्षिण स्वाभिमान जनसंवाद यात्रेला मिळणारा हा प्रतिसाद अभूतपूर्व आहे. कित्येक वर्षांपासून मी राजकीय क्षेत्रात कार्यरत आहे, अनेक निवडणुका मी बघितल्या आहेत. पण, जनतेने निवडणूक हातात घेऊन उत्स्फूर्तपणे कोणाच्यातरी मागे उभे राहणे ही बाब अभूतपूर्व आहे.
आपलं स्वतःचं लेकरू निवडणुकीला उभं आहे असं समजून मला आज अनेक वडीलधाऱ्यांनी कोणी १००, कोणी २०० तर कोणी ५०० रुपये प्रेमाने दिले, वडगावच्या रोकडे बाबांनी तर माझ्या खिशात ५०० रुपये टाकून “तुला काहीतरी खायला घे” तुझी तब्येत खूप खराब झाली आहे” असं बजावून सांगितलं. आज समोर प्रचंड मोठी धनशक्ती उभी असतानाही मला भीती वाटत नाही याचं कारण हेच आपलं प्रेम आहे, जनतेचं हे प्रेम मला मिळतंय याचा खरोखर आनंद आहे.
एक सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीच्या विरोधात अनेक दशकांची, धनशक्ती अशी ही निवडणूक असून जनतेचा हा पाठिंबा पाहता सामान्य माणसाची ताकद यंदा धनशक्तीला भारी पडणार हा विश्वास आहे.