नगर : जिल्ह्याच्या उत्तर भागातील, शिर्डी मतदारसंघातील रखडलेल्या निळवंडे धरणाच्या प्रश्नावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल चढवला. ८ कोटी रुपयांचा खर्च असलेले निळवंडे धरण ५० वर्षांत पूर्ण करू न शकल्याने ५ हजार कोटी रुपयांपर्यंत त्याचा खर्च गेला, हे काँग्रेसचे पाप आहे. कारण हा पैसा जनतेचा आहे, धरणाच्या कामाच्या नावावर काँग्रेस नेत्यांनी खिसे भरले, असा आरोप पंतप्रधान मोदी यांनी केला.
महायुतीचे नगर मतदारसंघातील उमेदवार डॉ. सुजय विखे व शिर्डी मतदारसंघातील उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज नगर शहरात प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. या प्रचारसभेत पंतप्रधान मोदी यांनी आवर्जून निळवंडे धरणाचा उल्लेख करत काँग्रेसवर टीकाश्र सोडले.
निळवंडे प्रकल्पाचे उद्घाटन गेल्यावर्षी २६ ऑक्टोबर २०२४ रोजी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झाले होते. त्याचा संदर्भ देत पंतप्रधानांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली.
पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते निळवंडे प्रकल्पाचे उद्घाटन झाल्यानंतर त्यावरून भाजप नेते तथा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे व काँग्रेस नेते माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यामध्ये निळवंडे धरणाच्या कामावरून श्रेयवाद रंगला होता. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांनी निळवंडेचा संदर्भ देत आवर्जून केलेला उल्लेख लक्षणीय ठरतो.
पंतप्रधान म्हणाले काँग्रेस नेत्यांचे खिसे भरले मात्र शेतकऱ्यांची शेती कोरडीच राहिली. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी सन २०१७ मध्ये धरणाच्या कामाला गती दिली. त्याचा आज फायदा अहिल्यानगर व नाशिकमधील हजारो एकरमधील शेतकऱ्यांना मिळतो आहे.